Video: मध्यरात्रीचा अघोरी प्रकार..! भोर तालुक्यात घरांसमोर लिंबू-गुलालाच्या जादूटोण्याच्या पुड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 12:34 IST2026-02-01T12:33:00+5:302026-02-01T12:34:09+5:30
- या घटनेनंतर काही गावांमधील तरुणांनी पुढाकार घेत अंधश्रद्धेला बळी न पडता सर्व पिशव्या गोळा करून कचऱ्यात टाकून दिल्या.

Video: मध्यरात्रीचा अघोरी प्रकार..! भोर तालुक्यात घरांसमोर लिंबू-गुलालाच्या जादूटोण्याच्या पुड्या
भोर - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आचारसंहितेच्या काळात भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात मध्यरात्री जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने प्लास्टिकच्या पिशवीत गुलाल, बुक्का, हळद-कुंकू लावलेले लिंबू, बिबवे व करडई यांचा तथाकथित ‘उतारा’ नागरिकांच्या घरासमोर तसेच तीन ते चार किलोमीटर अंतरावरील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी ठेवला असल्याचे समोर आले आहे.
खानापूर, अंबाडे, बाजारवाडी, मानकरवाडी, कोळेवाडी, बालवडी या गावांमध्ये हा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक नागरिक भीतीपोटी घरासमोर टाकलेला उतारा उचलण्यासही धजावत नसल्याचे चित्र आहे. घरातील महिला, पुरुष तसेच लहान मुले घाबरून गेली असून, ‘हा उतारा कशासाठी टाकण्यात आला?’ या प्रश्नाने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. काही गावांतील तरुणांनी मात्र पुढाकार घेत हे प्लास्टिकच्या पिशव्यांतील साहित्य एकत्र करून बाजूला काढून टाकले. यादरम्यानच व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
या घटनेबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, हा प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचे सांगितले. मात्र, या प्रकाराबाबत अद्याप एकाही ग्रामस्थाने पोलिसांत तक्रार दिलेली नाही.
दरम्यान, खानापूर (ता. भोर) चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, रात्री दोनच्या सुमारास तीन चारचाकी वाहने एकत्र येऊन वेगवेगळ्या दिशेला गेल्याचे दिसून आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मते वशीकरण करण्याच्या उद्देशाने एखाद्या राजकीय पक्षाकडून हा प्रकार करण्यात आल्याचा संशयही काही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन राज्य सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अरुण बुरांडे यांनी ग्रामस्थांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. ‘लिंबू, बिबवे, गुलाल यांचा उतारा टाकल्याने काहीही होत नाही. ग्रामस्थांनी अंधश्रद्धेला थारा देऊ नये आणि बुवाबाजी करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे वीसगाव खोऱ्यातील गावांमध्ये भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.