Pune Airport : क्षमात ९० लाख प्रवाशांची; परंतु कोटीपेक्षा जास्त उड्डाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:34 IST2025-06-14T10:32:39+5:302025-06-14T10:34:13+5:30
-पुणे विमानतळावरून मागील वर्षात एक कोटी पाच लाख प्रवाशांनी केला प्रवास

Pune Airport : क्षमात ९० लाख प्रवाशांची; परंतु कोटीपेक्षा जास्त उड्डाणे
-अंबादास गवंडी
पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत वाढच होत आहे. मागील आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरून एक कोटी पाच लाख प्रवाशांनी प्रवास केला. परंतु, विमानतळाची क्षमता ९० लाख असताना वाढत्या प्रवाशांमुळे विमानतळावरील भार वाढत आहे. त्यामुळे अनेक वेळा विमानांना उशीर होत आहे. शिवाय विमानतळाजवळ घनकचरा टाकत असल्याने अनेक वेळा पक्षी घिरट्या घातल्याने विमानांना आकाशात घिरट्या घालावी लागते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लोहगाव येथील नवीन टर्मिनल ५१ हजार ५९५ चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारले आहे. या टर्मिनलची वर्षाला ९० लाख प्रवासी क्षमता आहे. शिवाय वाढते विमान उड्डाणे, प्रवासी बोर्डींग पूल, प्रवासी लिफ्ट, एक्सलेटर, कट चेक इन काउंट, बॅग हँडलिंग सिस्टम, इन लाइन एक्सरे यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे. परंतु, गुरुवारी झालेल्या विमान अपघातामुळे विमानतळ सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विमानतळाची क्षमता कमी असूनही, विमानांची संख्या वाढविणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. सध्या पुणे विमानतळावरून २१० विमानांची उड्डाणे होत आहे. शिवाय मागील आठवड्यात आणखी १५ उड्डाणी संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन २२५ ते २३० विमानांची उड्डाणे होणार आहे. त्यामुळे साहजिकच प्रवासी संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा पुढच्या वर्षी प्रवासी संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे विमानतळ सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रात्रीच्या वेळी खुलेआम लूटमार :
विमानतळावरून सर्वाधिक विमाने रात्री १० ते १२ दरम्यान उड्डाण करतात. त्यामुळे रात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रात्री आणि पहाटे कॅबची उपलब्धता कमी असते. त्यामुळे बऱ्याचदा कॅब उपलब्ध नसल्याचा मेसेज प्रवाशांना येतो. कॅबची मागणी वाढल्याचे दाखवून कॅबचालकांकडून जादा दर आकारले जातात. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. काही वेळा ५०० रुपयांच्या प्रवासासाठी एक हजार ते दीड हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागते.
या आहेत समस्या...
- रिक्षा, कॅब एकाच ठिकाणी असल्याने वाहतूक कोंडी होते.
- रात्रीच्या वेळी जवळचे बुकिंग घेण्यासाठी कॅब चालकांचा नकार.
- बसण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिेक, लहाने मुले यांना उभे राहावे लागते.
- कॅबची सेवा एकाच मजल्यावर असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
- बाहेरील कॅबचालकांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात.
- कॅब बुक केल्यावर किमान ३० मिनिटे वाट पाहावी लागते.
- रात्रीच्या वेळी अव्वाच्या सव्वा दर आकारुन प्रवाशांकडून खुलेआम लूट केली जाते.
विमानतळ प्रशासन लक्ष देणार का ?
शहरातील कॅबचालकांवर कोणाचेही नियंत्रण नसून, उघडउघड प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे. पुणे विमानतळावरून काही वेळा रात्रीच्या वेळी दुप्पट, तिप्पट दर आकारले जाते, शिवाय जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी स्वीकारलेली बुकिंग कॅबचालकांकडून रद्द करण्यात येते. काहीवेळा मारामारीदेखील होत आहे. यामुळे एरोमालच्या कारभाराकडे विमानतळ प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची लूटमार थांबविण्यासाठी विमानतळ प्रशासन काही हालचाल करणार आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.