राजमाता भुयारी मार्ग रखडला; भारती विद्यापीठ परिसर वाहतूक कोंडीत अडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:51 IST2026-03-21T12:51:34+5:302026-03-21T12:51:54+5:30
- निधी असूनही काम ठप्प; पावसाळ्यात जीवितास धोका; प्रशासनावर नागरिकांचा संताप

राजमाता भुयारी मार्ग रखडला; भारती विद्यापीठ परिसर वाहतूक कोंडीत अडकला
पांडुरंग मरगजे
धनकवडी : बारमाही वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या राजमाता भुयारी मार्गातील प्रलंबित कामांमुळे वाहतुकीचे ‘तीन’ तेरा, वाजले असून, वाहतूक कोंडीच्या फटक्यात सर्वसामान्य नागरिकांचा घाम निघतोय तर पादचाऱ्यांचा श्वास गुदमरतोय. अनेक वर्षांपासून नागरिकांना या गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नगरसेवक अरुण राजवाडे यांनी सभागृहात महापौर व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असून, तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली.
केंद्राचा निधी उपलब्ध असतानाही विविध सेवा लाईन्स, पाणी, स्ट्रॉम व एमएनजीएल स्थलांतरित न झाल्यामुळे काम रखडले आहे. परिणामी, पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. राजवाडे यांनी प्रशासनाकडे तातडीने कृती आराखडा सादर करण्याची मागणी करत कात्रज ते नवले ब्रिज दरम्यानचा १२ मीटर डीपी रस्ता विकसित करणे, अपूर्ण ड्रेनेज काम पूर्ण करणे आणि त्रिमूर्ती चौक ते भारती विद्यापीठ बॅक गेट परिसरातील पार्किंग समस्येवर ठोस नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
दरम्यान, भारती विद्यापीठ मागील त्रिमूर्ती चौकात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून, नागरिक अक्षरशः कोंडीत सापडत आहेत. ‘प्रशासन मूग गिळून गप्प का?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून प्रलंबित कामांना गती द्यावी, अशी ठाम मागणी राजवाडे यांनी सभागृहात केली आहे. या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
पावसाची चाहूल; नागरिकांसमोर पुन्हा ‘पाण्यातून वाट’ची वेळ?
अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त होत असतानाच येत्या दोन-तीन महिन्यांत मान्सून पुणे शहरात दाखल होण्याचा अंदाज आहे. मात्र, राजमाता भुयारी मार्गाचे काम अद्याप रखडलेले असल्याने यंदाचा पावसाळाही नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. दरवर्षीप्रमाणे या भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते, रस्ते जलमय होतात आणि वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अक्षरशः पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतो. यामुळे अपघाताचा धोका वाढतोच, शिवाय आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होतात. यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास यंदाही परिस्थिती ‘जैसे थे’च राहण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.