पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास विभागाकडून ६० कोटींची तरतूद : जयकुमार गोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 15:49 IST2025-06-08T15:49:31+5:302025-06-08T15:49:52+5:30

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १९ जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. या सोहळ्याची प्रशासनातर्फे तयारी अंतिम टप्प्यात आहे.

Provision of Rs 60 crores from Rural Development Department for Palkhi ceremony: Jayakumar Gore | पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास विभागाकडून ६० कोटींची तरतूद : जयकुमार गोरे

पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास विभागाकडून ६० कोटींची तरतूद : जयकुमार गोरे

नीरा : यावर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागामार्फत ६० कोटींची तरतूद केली आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पालखी मार्गावर ठिकठिकाणी निवारा शेड उभारल्या जातील. तसेच नीरा पालखी तळाच्या काॅंक्रिटीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी तत्काळ देत असून, तातडीने हे काम पूर्ण करण्याच्या सूचना पुणे जिल्हा परिषदेला दिल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १९ जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. या सोहळ्याची प्रशासनातर्फे तयारी अंतिम टप्प्यात आहे. याची पाहणी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. पुणे जिल्ह्यातील नीरा विसावा स्थळाला भेट दिली असता, ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार विक्रम राजपूत, जेजुरीचे सपोनि. दीपक वाकचौरे, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण, बाळासाहेब भोसले, योगेंद्र माने, प्रमोद काकडे, उमेश चव्हाण, दीपक काकडे, साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखने, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, लोणंदचे सपोनि. सुशील भोसले यांच्यासह पुणे जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गोरे पुढे म्हणाले, मागील वर्षी ज्या-ज्या अडचणी आल्या त्या अडचणींचा अभ्यास करून प्रशासनाने यावर्षीच्या पालखी सोहळ्याची सर्व तयारी केली आहे. पावसामध्ये वारकऱ्यांसाठी निवारा ठिकाणे असावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांच्या होत्या. त्यानुसार जर्मन अँगल वापरून यावर्षी आम्ही सात ते आठ लाख स्क्वेअर फुटाची निवारा व्यवस्था निर्माण करत असल्याचेही गोरे यांनी म्हटले आहे.

पालखीची खूप चांगली तयारी केली आहे. सर्व अडचणींवर मार्ग काढण्याचे काम प्रशासन व आम्ही सर्वजण करत आहोत. चालूवर्षी पाऊस खूप झाला आहे. या पावसामुळे छोटे-मोठे नुकसान झाले आहे, रस्ते खराब झाले आहेत, पालखी तळांवर पाणी साठले आहे. फलटण तालुक्यातील तरडगावचा संपूर्ण पालखी तळ पाण्यात गेला आहे. तो दुरुस्त करण्यास सांगितले आहे. त्यासाठी दीड कोटी खर्च येणार आहे. दहा दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

पंढरपूर वाखरीमध्ये काय अडचणी होत्या, त्या सर्वांना पर्यायी व्यवस्था करायचं काम चालू आहे. पावसामध्ये वारकऱ्यांसाठी काही निवारा ठिकाणे तयार केली पाहिजेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. सात ते आठ लाख स्क्वेअर फुटाचे जर्मन अँगल यावर्षी आम्ही टाकत आहोत. त्यातून निवारा होईल.

स्वागत कमानी व स्टेज नकोच

स्वागत कमानीचा विषय नव्हता. काही ठिकाणी लोक स्वागत कमानी उभ्या करतात आणि त्याठिकाणी स्टेज घालून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. डीजे लावतात त्याचा कर्कश असा आवाज येतो. या संदर्भात आळंदी पालखी विश्वस्तांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही केली आहे.

सरकारचे आठ ते दहा कोटी वाचले

शौचालय टेंडर सोलापूर जिल्ह्यावरून पुणे जिल्ह्याला. त्याच्या पाठीमागे काही स्टेटस नाही. गेल्या काही वर्षांपासून हे टेंडर पुण्यात होते. आताही आम्ही पुण्यातच केलं. सोलापूरला डिव्हाईड करून काय करता येते का? याचा प्रयत्न आपण केला होता. काही गोष्टींत आपण त्या टेंडरमध्ये मोनोपोली होती त्याला छेद देत निर्णय घेतले. त्यामुळे चालूवर्षी सरकारचे आठ ते दहा कोटी रुपये वाचले. मागील वर्षी टेंडर साधारण २४-२५ कोटी रुपयांचं होतं, ते वाढवून आता २७-२८ कोटी रुपयांचं होत होतं. ते आता १५-१६ कोटींवर येईल. 

Web Title: Provision of Rs 60 crores from Rural Development Department for Palkhi ceremony: Jayakumar Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.