पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाभिमुख योजनांमुळे घराघरांत समृद्धी - हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 15:13 IST2024-02-12T15:12:42+5:302024-02-12T15:13:00+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे राज्यात व पुणे जिल्ह्यात भाजपचा जनाधार वाढत चालला आहे

Prosperity in households due to development oriented schemes of Prime Minister Narendra Modi - Harshvardhan Patil | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाभिमुख योजनांमुळे घराघरांत समृद्धी - हर्षवर्धन पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाभिमुख योजनांमुळे घराघरांत समृद्धी - हर्षवर्धन पाटील

लासुर्णे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत राबविलेल्या मोफत अन्नधान्य योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, उज्ज्वला गॅस योजना, आदी असंख्य विकासाभिमुख योजनांमुळे घराघरांत समृद्धी निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे राज्यात व पुणे जिल्ह्यात भाजपचा जनाधार वाढत चालला आहे, असे गौरवोद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोरी येथे काढले.

बोरी (ता. इंदापूर) गावामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या गाव चलो अभियानास शनिवारी (दि. १०) दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी बोरी गावामध्ये शनिवारी रात्री मुक्काम केला, तर रविवारी (दि. ११) सकाळी ग्रामस्थांशी चहापान करीत गाठीभेटी घेत या मुक्कामी अभियानाचा हर्षवर्धन पाटील यांनी समारोप केला. या अभियानामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी बोरी गावामध्ये ठिकठिकाणी चर्मकार, मुस्लिम, लोहार, ब्राम्हण, मारवाडी, कुंचीकोरवी समाज (केरसुनी व्यवसाय), वडार तसेच घोंगडी विणकर व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक वर्गाची भेट घेऊन चर्चा केली व त्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. तसेच द्राक्ष शेती, पॉलिहाऊस यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे डॉ. हरिभाऊ वाघमोडे आश्रमशाळेत भेट देऊन तेथे ५१ हजार रुपयांची रोख देणगी दिली. तसेच हर्षवर्धन पाटील खंडोबा मंदिर येथे आरती केली. यावेळी पृथ्वीराज जाचक व मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर रात्री हर्षवर्धन पाटील यांनी वैभव देवडे या कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम केला. यावेळी भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा (फादर बॉडी) उपाध्यक्षपदी वैभव देवडे व भाजपच्या इंदापूर तालुका युवा मोर्चाच्या सचिवपदी सनी गवळी या दोघांना नियुक्तीपत्रे भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे व तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते विनायक ढालपे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

रस्त्यांना निधी म्हणजे तालुक्याचा सर्वांगीण विकास नव्हे 

विद्यालये, कॉलेज, सहकारी संस्था, कृषी प्रक्रिया संस्था काढणे व चालविणे, आरोग्य सेवा, सिंचनाच्या सुविधा, बंधारे बांधणे, वीज केंद्र उभारणे, सामाजिक एकोपा व शांतता ठेवणे, अशाप्रकारे सामाजिक स्वास्थ्य राखणे म्हणजे जनतेचा सर्वांगीण विकास होय. हे काम २० वर्षे आम्ही केले. मात्र, सध्या फक्त रस्त्यांसाठी आलेल्या निधीतून शासकीय निकष न पाळता कमकुवत रस्ते तयार करणे व शासकीय निधीचा दुरुपयोग करणे म्हणजे विकास नव्हे, असा टोला यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील विरोधकांना लगावला.

Web Title: Prosperity in households due to development oriented schemes of Prime Minister Narendra Modi - Harshvardhan Patil