'दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले तर अभिमान..."; आमदार सुनिल शेळकेंचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 11:46 IST2026-03-29T11:29:20+5:302026-03-29T11:46:24+5:30
मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर आता आमदार सुनिल शेळके यांनी मोठे विधान केले आहे.

'दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले तर अभिमान..."; आमदार सुनिल शेळकेंचे मोठे विधान
मागील काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठका झाल्याचे बोलले जात आहे, आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी याबाबत विधान केले आहे.अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी "सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील, तर अजूनही वेळ गेलेली नाही," असे विधान करत विलीनीकरणाचे संकेत दिले आहेत.
"दादांच्या दुर्घटनेनंतर शरद पवार यांच्या पक्षातील काही मंडळी सांगत होते, आमच्या दादांसोबत चर्चा झाल्या, दोन्ही पक्ष एकत्रित पुढे जायचं आहे, परंतु अशा पद्धतीने आमच्याशी किंवा पक्षातील कोणत्याही नेत्यांशी दादांनी विस्तृतपणे चर्चा केलेली नव्हती, परंतु ठीक आहे, दोन्ही पक्ष एकत्रित असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका किंवा भावना एकच होती. दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि उत्तर अधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी आल्या पाहिजेत, आदरणीय अजित दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, ती जबाबदारी, तो मान, सुनेत्रा वहिनींना मिळाला पाहिजे होता. ही आमची भूमिका स्पष्ट होती, असेही सुनील शेळके म्हणाले.
"आज सुनेत्रा वहिनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होत असेल सुनेत्रा वहिनींचा नेतृत्व त्यांना मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून पुढे जात असेल तर तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल, आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनी सकारात्मकपणांनी पाहायला पाहिजे",असेही सुनील शेळके म्हणाले.
...तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, दैनंदिन कामकाज करताना अजित दादांची उणीव पावलोपावली भासत आहे. दादांच्या निधनानंतर शरद पवार यांच्या पक्षातील अनेक नेत्यांची दादांशी चर्चा झाली असून, दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत होते. "दादांचे उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सन्मान मिळायला हवा, ही भूमिका वरिष्ठ नेत्यांनी मांडली असून ती योग्यच आहे.
"उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारून जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुन्हा एकदा एकसंघ आणि मोठा होईल, असेही आमदार शेळके म्हणाले.