अंधाराचा फायदा घेत 'उजनी'मध्ये बेसुमार वाळूउपसा; कालठण ते कांदलगाव हा पट्टा केंद्रबिंदू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:23 IST2025-06-12T10:22:47+5:302025-06-12T10:23:07+5:30
- फायबर बोटी व तेवढ्याच सक्शन बोटीद्वारे उपसा, नावे समजूनही गुन्हे दाखल न होण्याचे गौडबंगाल

अंधाराचा फायदा घेत 'उजनी'मध्ये बेसुमार वाळूउपसा; कालठण ते कांदलगाव हा पट्टा केंद्रबिंदू
- शैलेश काटे
इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. कालठण ते कांदलगाव हा पट्टा बेकायदा वाळू उपशाचे केंद्रबिंदू ठरला आहे. दररोज किमान ५० फायबर बोटी व तेवढ्याच सक्शन बोटींच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी वाळू उपसा केला जातो. हजारो रुपयांचा व्यवहार पार पडतो. महसूल व पोलिस यंत्रणा मात्र बेवारस बोटी फोडण्याची कारवाई करते. शासनदरबारी त्याची नोंद होते की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. वाळू चोरांची नावे नोंदवल्याचे दिसत नाही.
इंदापूर तालुक्याला भिगवण ते तरटगाव असा ३५ किलोमीटर अंतराचा उजनी धरण पाणलोट क्षेत्राचा प्रदीर्घ पट्टा लाभलेला आहे. भीमा नदीची वाळू कसदार व बांधकामासाठी चांगल्या दर्जाची समजली जाते. त्यामुळे तिला चांगली मागणी आहे. शासनाच्या अनास्थेमुळे नदी स्वच्छ होत नाही. त्यामुळे उजनी धरण व भीमेच्या पात्रात भरपूर गाळ व त्याच प्रमाणात वाळूसाठा लपलेला आहे. हे काळे कसदार सोने चोरणाऱ्यांच्या मोठमोठ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. स्थानिक टोळ्यांना परजिल्ह्यातील टोळ्यांची कुमक मिळाली आहे.
सध्या कांदलगाव, महादेवनगर, शहा, माळवाडी, अजोती, सुगाव, गंगावळण, शिरसोडी, पडस्थळ, कालठण गावांच्या हद्दीतील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. दररोज सायंकाळी पाच
वाजल्यानंतर किमान ५० फायबर व तेवढ्याच सक्शन बोटींद्वारे वाळू उपसा सुरू होतो. प्रत्येक गावामधून असंख्य ट्रक भरून वाळू उचलली जाते. सध्या वाळू उपसा करणाऱ्यांनी शहा गाव व त्याभोवतीचा परिसर यावर लक्ष केंद्रित केले आहे. वाळू चोरांना हा परिसर, काढलेल्या वाळूचा साठा करून ठेवण्यासाठी सुरक्षित व वाहतुकीसाठी सोपा वाटतो. याखेरीज या गावामधील कथित प्रतिष्ठितांचे हातही या वाळूच्या धंद्यात गुंतले आहेत.
वाळू उपशावर महसूल व पोलिस यंत्रणेची कारवाई हा एक विनोदाचा भाग होऊन बसला आहे. जेवढ्या प्रमाणात वाळू उपशासाठी बोटींचा वापर केला जातो त्याच्या एक टक्काही बोटी महसूल व पोलिस यंत्रणेच्या पथकास सापडत नाहीत. पाठलाग करून पकडलेल्या बोटी नंतर कशा बेवारस ठरतात. त्यामध्ये वाळू कशी काय नसते. त्या बोटी कोणाच्या असतात, त्यांची नाते का पुढे येत नाहीत. गुन्हे का दाखल होत नाहीत, हे गौडबंगाल कधीच कळत नाही.
वाळू चोरांची स्थानिक मच्छिमारांवर दादागिरी
पाणलोट क्षेत्रात मासेमारी हा आणखी एक मोठा व्यवसाय आहे. रीतसर चालणारा हा व्यवसाय वाळू उपशामुळे संकटात सापडला आहे. मासेमारीसाठी वापरात येणारी जाळी वाळू उपसा करणाऱ्या बोटी व इंजिनच्या पाठीमागे लावलेल्या पंख्यामुळे तुटतात.
मासे सापडणे जिकिरीचे होते. मस्तवाल वाळूचोरांना जाब विचारणे म्हणजे आपला जीव संकटात टाकणे हे मच्छिमारांना माहिती आहे. त्यांची दहशत व दादागिरीस सामोरे जाण्यापेक्षा गप्प बसणे सोयीचे अशी भूमिका मच्छिमारांना घ्यावी लागत आहे.
चोरीनंतर शासकीय यंत्रणा सज्ज
प्रशासकीय यंत्रणेतील अनेक जणांचे वाळू चोरांशी संबंध आहेत. वाळू चोरांच्या अदृश्य साथीदारांनी अगदी तहसीलदारांच्या निवासस्थानापासून ते पोलिस वसाहतीतील 'त्या' विशिष्ट खोलीपर्यंत पाळत ठेवलेली असते. कर्तव्यावर 'अर्थ'पूर्ण हात फिरला की चोर चोरी करायला मोकळे असतात. चोरी झाल्यानंतर कर्तव्य पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज होत असते, असा प्रकार इकडे घडतो. तो जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत वाळूच्या धंद्याला मरण नाही, असे अवैध वाळू व्यावसायिक छातीठोकपणे सांगत असतात.