महापालिकेत समाविष्ट होण्यास माण हिंजवडीकरांचा विरोध कायम..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:09 IST2025-06-28T14:03:20+5:302025-06-28T14:09:31+5:30
- परिसरातील गावे महापालिकेत घेण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नगर परिषद अथवा नगर पालिका करा यासाठी ग्रामपंचायती आग्रही असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.

महापालिकेत समाविष्ट होण्यास माण हिंजवडीकरांचा विरोध कायम..!
हिंजवडी : आयटी परिसरातील गावे महापालिकेत जाणार असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. यापूर्वी विशेष ठराव मंजूर करून तसेच, राज्य सरकारला पत्र व्यवहार करून माण, हिंजवडी ग्रामपंचायतींनी महापालिकेत जाण्यास आपला विरोध दर्शवला आहे. परिसरातील गावे महापालिकेत घेण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नगर परिषद अथवा नगर पालिका करा यासाठी ग्रामपंचायती आग्रही असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
दरम्यान, हिंजवडी, माण, मारुंजीसह परिसरातील गावे महापालिकेत जाणार अशी चर्चा मागील काही वर्षांपासून सुरु आहे. अनधिकृत बांधकामे, पायाभूत सोयी सुविधांची कमतरता, वाढते नागरिकरण आणी बकालीकरण अशी कारणे पुढे करत सदर गावे महापालिकेत घेतली पाहिजे अशी भूमिका काही नेते मंडळी वारंवार घेत आहेत. मात्र, महापालिकेच्या हद्दीत सुद्धा वरील समस्या आणी पायाभूत सोयी सुविधांचा उडालेला बोजवारा पहायला मिळत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
परिसरातील ग्रामपंचायती आर्थिक दृष्टीने सदन आहेत. त्यास, पीएमआरडीए, एमआयडीसी, पीडब्लूडी आणी इतर कार्यरत प्रशासकीय यंत्रणांची प्रामाणिक आणी योग्य साथ लाभल्यास गावांचा अपेक्षित विकास होऊ शकतो असा ग्रामपंचायतींचा सुर आहे. त्यामुळे, आयटीतील गावे महापालिकेत घेण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नगरपालिका अथवा नगर परिषद करा अशी आग्रही मागणी वारंवार होत आहे.
आयटीपार्कचा साठ टक्क्याहून अधिक भाग माण ग्रामपंचायत हद्दीत येतो. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामस्थांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत सक्षम आहे. याठिकाणी कार्यरत असणाऱ्या इतर प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे आयटी परिसरात मूलभूत समस्या जाणवत आहे. मात्र, त्यासाठी महापालिका हा एकमेव पर्याय नाही. याठिकाणी स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. - अर्चना सचिन आढाव : सरपंच, माण
परिसरात वाढती लोकसंख्या पाहता मौजे हिंजवडीसह शेजारील पाच गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. महापालिकेत समावेश होण्यास आमचा तीव्र विरोध आहे. तसा पत्रव्यवहार शासन दरबारी करण्यात आला आहे. शासनाने ग्रामस्थांच्या भावनेचा सहानुभूती पूर्वक विचार करावा. स्वतंत्र नगर पालिकेसाठी आग्रही आहोत. - गणेश जांभुळकर : सरपंच, हिंजवडी