चाकण: महामार्गांसह परिसरातील सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवणे अक्षरशः जीवघेणे ठरत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही ढिम्म प्रशासन आणि राजकीय नेत्यांकडून या प्रश्नाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यावर लवकर काही तरी निर्णय घ्या ! कारण आमच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे. असा निर्वाणीचा इशारा चाकणकरांनी दिला आहे.
स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालयातवाहतूक कोंडी संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अंकुश जाधव,चाकण वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक प्रकाश राठोड,एमएसईबीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे, भाग्यश्री गिरी,अशपाक आलम, प्रिया पवार, मृन्मय काळे, प्रकाश गोरे, निलेश गोरे, प्रविण गोरे, महेश शेवकरी, रोनक गोरे, विशाल नायकवाडी, किरण कौटकर, अमोल साळवे, गणेश भुजबळ, रावसाहेब नाणेकर, रंगनाथ गोरे, स्वामी कानपिळे आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकणच्या मुख्य महामार्गांवर मोठ्या संख्येने लहान मोठ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यात अपुरे रस्ते, रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि अवैध प्रवासी वाहतूक आदी समस्यांनी स्थानिक नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. याकडे वाहतूक पोलिस, चाकण नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमआयडीसी, पीएमआयआरडीए आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत आहे. यावर लवकर तोडगा काढा असा चाकणकरांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
अपुऱ्या सुविधांमुळे स्थानिकांचे बळी पडत आहे.आम्ही किती दिवस सहन करायचे?राष्ट्रीय महामार्ग म्हणता त्यावरून जनावरांना ही चालायला लाज वाटेल,अशी स्थिती त्याची झाली आहे.कधी रस्ता करणार?वाहतूक कोंडी कमी कधी करणार? आदी प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले.
वाहतूक कोंडी आणि रस्त्यांसंदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन सूचना सुचवण्यात आल्या आहेत.त्यावर संबंधित विभागांनी काम करून दहा ते बारा दिवसांत काम करावे. - नितीन गोरे,अध्यक्ष, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान.