पुणे: आपली लढाई ‘तुकाराम विरूद्ध नथुराम’ अशी आहे. आपण तुकाराम आहोत, त्यामुळे आपण नक्की जिंकणार आहोत, अशा जोरदार शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्धापनदिन कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली. त्यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, निलेश लंके व अन्य नेत्यांनीही जोरदार टोलेबाजी करत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्याना आगामी निवडणुकांसाठी तयार केले.
पाटील म्हणाले, पक्षस्थापनेला २६ वर्षे झाली. या २६ वर्षांमध्ये फक्त राज्यातच नाही तर देशातही पक्षाचे मोठे योगदान आहे. शरद पवार यांच्यासारखा वटवृक्ष आपल्यासोबत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पक्षाने राज्यात, देशात मोठा दुरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले. आजही अनेक नेते पवार यांच्यासोबतच आहेत. संख्या महत्वाची नाही, गुणवत्ता महत्वाची आहे. ही लढाई तुकाराम विरूद्ध नथूराम अशी आहे. आपण तुकाराम आहोत, त्यामुळे विजय आपलाच आहे. खासदार सुळे यांनी फक्त वडिल म्हणून नाही तर एक राजकीय नेता म्हणूनही शरद पवार यांची निर्णयक्षमता, पुढचे पाहण्याची दृष्टी याचे आकर्षण असल्याचे सांगितले. पक्ष कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वाडी, वस्ती, गाव, तालुका या स्तरावर असे वर्ग व्हावेत. वैशाली हगवणेसारखे हुंडाबळी होतात हे आश्चर्यकारक आहे. का नाही आपण हुंडाबंदी चळवळ सुरू करत? पुढील महिन्यापासून आपण राज्याचा दौरा सुरू करणार आहोत असे सुळे यांनी सांगितले.
जयंत पाटील यांचा राजीनामा आलाच नाही
कार्यक्रमानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटील यांचा राजीनामा वगैरे काहीच नसल्याचा दावा केला. त्यांनी तसे पत्रही दिले नाही किंवा त्यांनी तसे सांगितलेलेही नाही असे त्या म्हणाल्या. त्यांनी त्यांचा वैयक्तिक विचार मांडला आहे. राजीनामा दिलेलाच नाही तर नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीचा प्रश्न येतो कुठे, असा प्रतिप्रश्न खासदार सुळे यांनी केला. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, माजी आमदार जयदेव गायकवाड, भूषणसिंह होळकर, मार्झिया पठाण यांची भाषणे झाली.