"निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस..."; कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा नवीन व्हिडीओमध्ये काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:32 IST2026-02-11T12:12:40+5:302026-02-11T12:32:38+5:30
Nirmala Nawale Karegaon Sarpanch : सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना दिवंगत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिली होती. पण, त्यांचा पराभव झाला आहे.

"निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस..."; कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा नवीन व्हिडीओमध्ये काय?
पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुणे जिल्हा परिषदेच्या कारेगाव पंचायत गटातून निर्मला नवले यांचा पराभव झाला असून, मनीषा पाचंगे यांनी त्यांचा पराभव करत विजय संपादन केले आहे. दरम्यान, आता नवले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी "निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरला... पण माझा लढा सुरूच राहील", असे म्हटले आहे. तसेच त्यांनी या निवडणुकीत पैशाचा आणि ड्रग्जचाही वापर केल्याचा आरोप केला आहे.
"माझा हा ३०० मतांनी झालेला हा पराभव अनपेक्षित होता, पण ज्या ६५७७ मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. आज वाईट याचं वाटतंय की विकासाच्या मुद्द्यांपेक्षा ‘पैसा’ आणि ‘व्यसनांनी’ ही निवडणूक गाजवली. पैशांच्या जोरावर मतं विकत घेता येतील, पण निष्ठा नाही. माझ्या गावातील तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जाताना पाहणं हे कोणत्याही विजयापेक्षा जास्त दुःखद आहे, राजकारण कदाचित खराब असेल, पण लोकांसाठी काम करण्याची माझी जिद्द संपलेली नाही, असंही नवले म्हणाल्या.
निर्मला नवले म्हणाल्या, आज माझ्या मतदारसंघातील मतदार पैशासाठी विकला गेला याचं वाईट वाटतंय. माझ्या गावातील ३० ते ४० तरुण ड्रग्सच्या आहारी गेली. आज कोणता उमेदवार जास्तीत जास्त पैसा वाटतो हेच निकष ठरले आहेत. जिंकून येण्यासाठी पैसे वाटले जातात. म्हणूनच आजची परिस्थिती झाली आहे की राजकारणात यायचे असेल तर आधी पैसे मिळवायचे ते लोकांना वाटयचे. असेच झाले आहे. आज मला अजितदादांचे ते शब्द आठवतात ते म्हणाले होते, राजकारण खूप वाईट आहे, असंही नवले म्हणाल्या.