माझ्या राजकारणाची सुरुवात श्री छत्रपती कारखान्यापासूनच; ‘छत्रपती’ हा आपला परिवार – उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:19 IST2025-10-31T17:17:27+5:302025-10-31T17:19:53+5:30
“‘छत्रपती’ला जुने दिवस आणण्यासाठी संचालक मंडळाला मेहनत करावी लागणार आहे.

माझ्या राजकारणाची सुरुवात श्री छत्रपती कारखान्यापासूनच; ‘छत्रपती’ हा आपला परिवार – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : माझ्या राजकारणाची सुरुवात श्री छत्रपती कारखान्यापासूनच झाली. त्यामुळे हा कारखाना माझ्याशी भावनिक दृष्ट्या जोडलेला आहे. ‘छत्रपती’ हा आपला परिवार आहे. शेतकरी सभासदांचे नुकसान होणार नाही, याची काळजी संचालक मंडळ घेईल. यासाठी आपण स्वतः आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे देखील कमी पडणार नाहीत, हा शब्द देतो, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातली.
भवानीनगर येथील श्री छत्रपती कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरुवात उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “‘छत्रपती’ला जुने दिवस आणण्यासाठी संचालक मंडळाला मेहनत करावी लागणार आहे. वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील. अधिकारी, कामगारांनीदेखील जबाबदारीचे भान ठेवून काम करावे. त्यानंतरच शेतकऱ्यांना चांगला दर देणे शक्य होईल. कारखान्याचा दर कमी होता, तरीदेखील माझ्या शेतातील ऊस ‘छत्रपती’लाच दिला. कार्यक्षेत्रात ऊस वाढवावा लागेल. त्यासाठी ‘एआय’ची मदत घेणार असल्याचे” उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे म्हणाले, “सभासदांनी आपला कारखाना काटा करण्याचे पाप कधीच करणार नाहीत. कारखान्याचा दर निश्चितपणे चांगला राहील. ‘छत्रपती’लाच ऊस गाळपासाठी द्यावा. हा कारखाना आपली सर्वांची ‘आई’ आहे. तिची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. या कारखान्याने अनेक गोष्टी शिकविल्या, या मातीने आम्हाला घडविल्याची जाण आहे. राजकारणात काम करताना त्याचा उपयोग होतो,” असे भरणे म्हणाले.
यावेळी चेअरमन पृथ्वीराज जाचक म्हणाले, “कारखान्याची ट्रायल सुरू असतानाच ५ लाख युनिट वीज निर्यात करण्याची किमया अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली. सभासदांनी ऊस गाळपासाठी आपल्याच कारखान्याला द्यावा. ऊस गाळप नोंदणीनुसारच पारदर्शकपणे होईल. कोणाचीच वशिलेबाजी होणार नाही. सोनं वजन केलं तरी बिनचूक वजन होईल. जुने दिवस आणण्यासाठी चांगले वातावरण आहे. सभासदांनी निर्धोकपणे ऊस द्यावा,” असे आवाहन जाचक यांनी केले. यावेळी सारीका भरणे, उपाध्यक्ष कैलास गावडे, आप्पासाहेब जगदाळे, प्रशांत काटे, पृथ्वीराज घोलप, शिवाजी निंबाळकर आदी संचालक उपस्थित होते.
“मिळालेली पदे मिरवण्यासाठी नसतात, तर त्यांचा उपयोग सर्वसामान्यांसाठी करण्याची अजित पवार यांची शिकवण आहे. त्यानुसार आम्ही काम करतो. काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्याने त्यांना माणसं आयुष्यभर विसरणार नाहीत. आपल्या कृषिमंत्रीपदाच्या काळातच हा निर्णय झाल्याचे मोठे समाधान आहे,” असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
‘छत्रपती’त काटकसर सुरू आहे. कारखान्याच्या गेस्टहाऊस आणि संचालक मंडळाच्या नाष्ट्याचे पैसे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक स्वतःच्या खिशातून देतात. “चेअरमन पद घेणं काही सुखाचं नाही. मला देखील ‘माळेगाव’ला असं करावं लागेल, अन्यथा म्हणतील ‘छत्रपती’ला चेअरमनचं लक्ष आहे, आमचा चेअरमन मात्र मुंबईत चकाट्या पिटतोय,” अशी मिश्कील टिपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.