‘माझी वसुंधरा’त मुळशी तालुक्याचा झेंडा उंच; पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 12:31 IST2026-02-22T12:29:50+5:302026-02-22T12:31:08+5:30
- पर्यावरण रक्षणाबाबत प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतलेले प्रयत्न या यशामागे महत्त्वाचे ठरले.

‘माझी वसुंधरा’त मुळशी तालुक्याचा झेंडा उंच; पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक
कोळवण :महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानात पुणे जिल्ह्यातून मुळशी तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा बहुमान मिळवला आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जलसंधारण, प्लास्टिकमुक्त उपक्रम आणि स्वच्छता मोहिमा प्रभावीपणे राबवल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून विविध पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले. जल संवर्धन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, हरित उपक्रम आणि व्यापक जनजागृती मोहिमांमुळे तालुक्याची कामगिरी जिल्ह्यात उठून दिसली.
पर्यावरण रक्षणाबाबत प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतलेले प्रयत्न या यशामागे महत्त्वाचे ठरले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
“मुळशी तालुक्याने मिळवलेला हा प्रथम क्रमांक तालुक्याच्या पर्यावरणविषयक बांधिलकीचे द्योतक असून, भविष्यातही हरित आणि स्वच्छ मुळशीसाठी प्रयत्न सुरूच राहतील” -सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, मुळशी