Raj Thackeray: पदाधिकाऱ्याला आईवरुन शिविगाळ केली अन् प्रकरण सुरु झालं; परप्रांतियांवर राज ठाकरे स्पष्टच म्हणाले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 13:15 IST2022-05-22T13:14:47+5:302022-05-22T13:15:06+5:30
जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

Raj Thackeray: पदाधिकाऱ्याला आईवरुन शिविगाळ केली अन् प्रकरण सुरु झालं; परप्रांतियांवर राज ठाकरे स्पष्टच म्हणाले!
पुणे- मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं, असं राज ठाकरे म्हणाले.
एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य तरी आहे का? याला अनेक पापुद्रे आहेत. काही तर असे आहेत, ज्यावर मला बोलताही येणार नाही. महाराष्ट्रातली माझी ताकद हकनाक तिथे अडकली असती. ती मला तिकडे सापडू द्यायची नव्हती. मी म्हटलं टीकाही सहन करायला तयार आहे, पण पोरं अडकू देणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीसाठी तिथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं. ते तिथून झालं, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी राणा दाम्पत्यावरही निशाणा साधला. मातोश्री बंगला काय मशीद आहे का, तिथे जाऊन हनुमान चालीसा म्हणायला? जे लोक मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला आले, त्यावरून एवढं काही घडलं, त्यांच्यासोबत तुम्ही लडाखमध्ये जेवताय? हे सगळे ढोंगी. 'पक पक पक पक' पुरतंच हिंदुत्व असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं
तुमच्या सोयीसाठी कशाला राजकारण बदलताय?-
आमच्या महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकतात. आम्हाला लाज, शरम वाटत नाही. कारण सत्ताधारीच असे बसलेत. औरंगजेब हा जर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांना सुफी संत वाटत असेल तर काय बोलायचं? तुमच्या सोयीसाठी कशाला राजकारण बदलताय?, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.