"मिशन १५" केवळ चमकोगिरीच; आदर्श रस्त्यांवरील चेंबर खिळखिळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 13:56 IST2025-02-23T13:55:32+5:302025-02-23T13:56:05+5:30
- रस्त्यांवरील चेंबर खिळखिळीत

"मिशन १५" केवळ चमकोगिरीच; आदर्श रस्त्यांवरील चेंबर खिळखिळीत
- हिरा सरवदे
पुणे : महापालिकेच्या पथ विभागाने मोठा गाजावाजा करत आदर्श रस्ते म्हणून जाहीर केलेल्या ‘मिशन १५’ मधील अनेक रस्त्यांवरील चेंबर अजूनही खड्ड्यांतच असून, जे चेंबर रस्त्याच्या समपातळीत घेतले आहेत, ते खिळखिळीत झाल्याचे चित्र आहे. याशिवाय या रस्त्यावर अद्यापही खोदाईची कामे कमी अधिक प्रमाणात सुरूच आहेत. त्यामुळे हे आदर्श रस्ते केवळ चमकोगिरी असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी होऊन वेग वाढावा, यासाठी महापालिकेचा पथ विभाग आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रित पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणारे गतिरोधक काढून टाकले. पहिल्या टप्प्यात १५ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. ‘मिशन १५’ जवळपास १०० किलोमीटरच्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले. काही महत्त्वाच्या चौकांमध्ये थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर करून डांबरीकरण करण्यात आले. तसेच, रस्त्यांवरील ड्रेनेजच्या चेंबरची झाकणे वरखाली असल्याने वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. चेंबरमुळे पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघात होतात, तसेच पाठदुखी, कंबरदुखी याचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागत होता, त्यामुळे ड्रेनेजची झाकणे देखील समपातळीत आणल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला होता.
शहरातील प्रमुख १५ रस्त्यांची नावे जाहीर करत ते दर्श केल्याची टीमकी वाजवत पथ विभागाने आणखी १७ रस्ते आदर्श करण्याचा संकल्प करत त्या रस्त्यांची नावेही जाहीर केली. या पार्श्वभूमीवर लोकमतने काही रस्त्यांची पाहणी केल्यानंतर पथ विभागाचे आदर्श १५ रस्ते केवळ चमकोगिरी असल्याचे समोर आले. या रस्त्यावरील पावसाळी लाइनचे चेंबर अजूनही जैसे थेच असून, साइट पट्ट्या व पदपथाची अवस्था बिकटच आहे. या रस्त्यावरील चेंबर जे रस्त्याच्या समपातळीवर आणल्याचे चित्र दिसते, त्याचे फाऊंडेशन खिळखिळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
पाहणीत काय दिसले...
- पौड रस्ता.....
पौडफाटा ते वनाज यादरम्यान सिमेंट-काॅंक्रिटच्या रस्त्यावर दोन पट्ट्यांमझ्ये फट निर्माण झाल्याने दुचाकी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गुजरात काॅलनी चौकात चेंबरचे झाकण तुटल्याने त्यात लाकूड उभे करून त्यांना झेंड्यासारखे कापड लावले आहे. तसेच, शिवतीर्थनगरच्या कमानीजवळ अजूनही खोदाई दिसते. मोरे विद्यालय चौकात चेंबरवरील जाळीची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. तसेच, मेट्रो स्टेशनच्या खाली साइटपट्ट्या व चेंबर खाली-वर आहे.
- कर्वे रस्ता...
कर्वे रस्त्यावर गरवारे काॅलेज ते खंडुजी बाबा चौक यादरम्यान साइट पट्ट्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. यादरम्यानचे चेंबर रस्त्याच्या समपातळीवर आणण्यात आले आहेत, मात्र त्याचे फाऊंडेशन खिळखिळीत झाले आहे. अनेक चेंबर खचून काही ठिकाणी भगदाड पडल्याचे पाहायला मिळते.
- सिंहगड रस्ता....
सिंहगड रस्त्यावर काशिद चौकाच्या जवळ गेली दोन आठवड्यांपासून एक चेंबर खचलेला आहे. त्यामध्ये माती टाकण्यात आली आहे. काही दिवस येथे लाकूड उभे करून त्याला कापडाचा झेंडा लावला होता, मात्र आता तो गायब झाल्याने अनेक वाहने त्यात आदळतात. तसेच, विठ्ठवाडी येथे हिंगण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी चेंबर खिळखिळीत झालेला आहे. राजाराम चौकात मागील खोदाई करून काम झाल्यानंतर रस्ता बुजविण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी ना डांबरीकरण ना काॅंक्रिटीकरण करण्यात आले. येथील ही परिस्थिती गेल्या तीन आठवड्यांपासून आहे. खोदलेला पट्टा मुख्य चौकात असल्याने वाहने त्यामध्ये आदळतात.
- कोरेगाव पार्क (नाॅर्थ मेन रोड)
महापालिकेने नाॅर्थ मेन रोड आदर्श केल्याचा दावा केला आहे. मात्र, या रस्त्यावरील चेंबरची अवस्था पूर्वीप्रमाणेच आहे. त्यातच प्रशासनाने हा रस्ता केवळ वेस्टीन हॉटेल चौकापर्यंतच आदर्श मानला आहे. तेथून ताडीगुत्ता चौक व पुढे मुढव्यापर्यंत वाऱ्यावरच सोडल्याचे चित्र आहे. रस्त्यावर जागोजागी खोदाई करण्यात आलेली आहे. साइट पट्ट्यांची व पदपथाची कामे कासवगतीने सुरू आहेत. यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूककोंडी होते.
अधिकारी म्हणतात, हे रस्ते आदर्श केले.....
- नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, वेल्सली रस्ता, मंगलदास रस्ता आणि संगवाडी रस्ता, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता, छत्रपती शिवाजी-बाजीराव रस्ता.
अतिक्रमणांचा विळखा तसाच...
महापालिकेच्या पथ विभागाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने १५ रस्ते आदर्श केल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रशासनाने या रस्त्यावरील व पदपथांवरील अतिक्रमणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. या सर्वच रस्त्यांना व पदपथांना आजही अतिक्रमणांचा विळखा कायम आहे. जागोजागी पदपथावरील व्यावसायिकांनी पदपथासह रस्त्यावर आपले साहित्य मांडल्याचे दिसते. त्यामुळे अतिक्रमणे जागेवरच ठेवून हे रस्ते आदर्श कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.