पुण्यात महापौर अन् मुंबईत उपमहापौर रिपाइंलाच मिळणार; रामदास आठवलेंचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 19:16 IST2021-10-19T18:21:22+5:302021-10-19T19:16:11+5:30
भाजप आणि रिपाइं एकत्र निवडणूक लढवणार असून, मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आणि मुंबईत उपमहापौर रिपाइंला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात महापौर अन् मुंबईत उपमहापौर रिपाइंलाच मिळणार; रामदास आठवलेंचा विश्वास
पुणे : भाजप मनसेच्या नादाला लागल्यास 'रिपाइं' भाजपचा नाद सोडेल का, असे विचारल्यावर 'आम्ही त्यांचा नाद सोडला तरी ते आमचा नाद सोडणार नाहीत,' असे आठवले म्हणाले. स्वतंत्र चिन्हावर लढायचे की, भाजपच्या हे अजून ठरले नाही. मात्र, एकत्र निवडणूक लढवणार असून, मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आणि मुंबईत उपमहापौर रिपाइंला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले विविध विषयांवर बोलत होते.
तर देवेंद्र फडणवीस यांना अजून मुख्यमंत्री असल्याचा भास होतो, यावर आठवले म्हणाले, ''त्यांना तसा भास होतो, तर दोन वर्षांनंतरही उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही मुख्यमंत्री नाहीत, असे वाटते, अशी मिश्किल टिपण्णी केली.यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिल्याचेही त्यांनी नमूद केले.''
पाकिस्तानने बळकावलेला भूभाग आपल्या पुन्हा परत आपल्या ताब्यात घ्यावा लागेल
''एकदा पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन जर भारतीय सैनिकांवर भारतीय नागरिकांवर दहशतवादी हल्ले केले जात असतील तर पाकिस्तानवर पुन्हा एक सर्जिकल स्ट्राइक करावं लागेल. पाकिस्तानी दहशतवादी हल्ले थांबवले नाही तर एकदा आरपारची लढाई लढावी लागेल. पाकिस्तानने बळकावलेला भूभाग आपल्या पुन्हा परत आपल्या ताब्यात घ्यावा लागेल असे मतही आठवले यांनी व्यक्त केले.''
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ नये
''भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळू नये असे माझ्या पक्षाचे मत आहे. खेळामध्ये राजकारण आणू नये हे जरी खरे असले तरी अशा परिस्थितीत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू नये असे माझे मत आहे. जयेश शहा यांना देखील मी हे सांगणार आहे.''
दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत
"जनधन, उज्वला आणि मुद्रा योजनाअंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा झाला आहे. आवास योजनेत अनेकांना पक्की घरे मिळाली आहेत. आयुष्यमान भारत योजनेत सव्वा दोन लाखाच्या वर लोकांना लाभ झाला आहे. जात-धर्म न पाहता नरेंद्र मोदी यांनी या योजना सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही, तर ज्या जाती अधिक मागास आहेत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे सोयीचे होणार आहे. दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे," असेही त्यांनी सांगितले.