Mass Copy in Maharashtra: सीसीटीव्हीमुळे 'मास कॉपी' उघड; ४५ जण निलंबित, तर चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 06:02 IST2026-02-26T05:59:00+5:302026-02-26T06:02:07+5:30
-उद्धव धुमाळे, पुणे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा प्रथमच दहावी -बारावीची परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आणली ...

Mass Copy in Maharashtra: सीसीटीव्हीमुळे 'मास कॉपी' उघड; ४५ जण निलंबित, तर चौघांना अटक
-उद्धव धुमाळे, पुणे
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा प्रथमच दहावी-बारावीची परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आणली आणि 'मास कॉपी'चा प्रकार उघड झाला. आतापर्यंत एकूण ४५ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, ४ जणांना अटक झाली आहे. या कारवाईने कॉपी प्रकरणांना ब्रेक लागला आहे. अशीच धडक कारवाई सुरू राहिली, तर कॉपीमुक्त परीक्षेचे ध्येय साध्य होईल.
परीक्षेत कुठे कुठे घडले 'मास कॉपी'चे प्रकार?
बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर विभागात बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे मास कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. यात १७ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी १२ जणांवर निलंबनाची कारवाई करण्याती आली आहे.
याच विभागात, याच दिवशी कन्नड तालुक्यातील जैतापूर येथेही सामूहिक कॉपीचा प्रकार घडला. यात २४ जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यापैकी २१ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे १६ फेब्रुवारीला परीक्षेदरम्यान काही 3 वेळ सीसीटीव्ही बंद ठेवण्याचा प्रकार घडला. ही बाब उघड होताच मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यासह निलंबनाची कारवाई झाली.
वाशिम जिल्ह्यात टो-जुमडाफाटा येथे देखील १६ फेब्रुवारी रोजी कॉपीचा प्रकार समोर आला. यात २७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूर येथील पेपरफुटी प्रकरणात ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
कोणत्या विभागात किती कॉपी प्रकरणे? (इयत्ता बारावीची परीक्षा)
पुणे - १०, नागपूर - ०१, छत्रपती संभाजीनगर -०३, अमरावती - २२, नाशिक - ०४, लातूर - ०२
भरारी पथकानेही केली राज्यात धडक कारवाई
बीड जिल्ह्यात कुर्ला येथे परीक्षा केंद्राच्या छतावर मंडप टाकण्यात आला होता. भरारी पथकाच्या निदर्शनास ही बाब येताच मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
गडचिरोली येथे परीक्षा केंद्रावर बारावीच्या पेपरदरम्यान 'चॅट-जीपीटी'चा वापर केला जात होता. ही बाब पाहणीत आढळून येताच ४ जणांवर गुन्हा नोंदवून निलंबन कारवाई करण्यात आली.
बारावीच्या परीक्षेत २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या पेपरमध्ये कॉपीचे २१ गैरप्रकार उघडकीस आले आहेत.
राज्यात इयत्ता बारावी आणि दहावीची परीक्षा तणावमुक्त आणि कॉपीमुक्त व्हावी म्हणून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, राज्य आणि जिल्हा दक्षता समितीमार्फत तपासणी देखील केली जात आहे. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे प्रथमच 'मास कॉपी'चा प्रकार सबळ पुराव्यासह उघड झाला. ४५ जणांना निलंबित केले असून, चौघांना अटक केली आहे. -डॉ. नंदकुमार बेडसे (अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे)