लग्न हेच सर्वस्व नाही..! मुलींच्या नजरेतील 'विवाह', आशा, अपेक्षांचा कोलाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:38 IST2025-06-02T15:37:36+5:302025-06-02T15:38:01+5:30
- नात्यात वेदना,त्रास, किंवा अपमान आला, तर मुली कुठल्या दिशेने वळतील? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही संवाद साधला विचारशील, आत्मभान असलेल्या मुलींशी. या मुली त्यांच्या पालकांच्या 'प्रिय शोना' आहेत.

लग्न हेच सर्वस्व नाही..! मुलींच्या नजरेतील 'विवाह', आशा, अपेक्षांचा कोलाज
-उजमा शेख
पुणे - विवाह ही स्वप्नांनी सजलेली,पण वास्तवाचे काटे असलेली वळणवाट आहे. नात्यात वेदना,त्रास, किंवा अपमान आला, तर मुली कुठल्या दिशेने वळतील? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही संवाद साधला विचारशील, आत्मभान असलेल्या मुलींशी. या मुली त्यांच्या पालकांच्या 'प्रिय शोना' आहेत. या मुलींच्या नजरेतील 'विवाह', आशा, अपेक्षा यांचा हा कोलाज. हा संवाद त्यांच्या विचारांचा तसेच आजच्या पिढीच्या नव्या दृष्टिकोनाचा प्रातिनिधिक आरसा आहे.
भावनेत वाहवत जाऊ नका
स्त्री ही एक भोगवस्तू किंवा मूल जन्माला घालण्याची मशीन नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा, अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. जिथं वाटलं की धाकात ठेवलं जात आहे, त्रास दिला जातोय, तिथून लगेच बाहेर पडावं. कायद्याची मदत घ्यावी. भावनिक होऊन निर्णय न घेता वास्तवाला सामोरे जावं. मुलींनी स्वतः च्या भविष्याच्या रेघा स्वतः निर्माण करून बिनधास्त आनंदात जगावं.
-तेजस्विनी राठोड (मराठी साहित्याची अभ्यासक)
प्रथम स्वतःचा विचार करा...
स्वतःला स्वतंत्र का महिला म्हणून ओळख पटवून २दिल्यानंतर मी लग्नाचा विचार करेन. लग्न हे बंधन नसतं, ते विश्वासाचे नातं असतं. माझं शिक्षण, माझे काम याबद्दल विचार करून मी भविष्यात लग्न करणार आहे. मी हुंड्याच्या विरोधात असून तशी मागणी असेल तर मला ते नाते जोडण्यापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा असेल. मी सक्षम मुलगी आहे, स्वतःला सांभाळू शकते. कोणी साथ दिली, नाही दिली हे बघून स्वतःचा विचार करेन.
- गजाला सय्यद (स्पर्धा परीक्षा विद्यार्थिनी)
.. तरच आयुष्य सुंदर बनेल
विवाहानंतर आयुष्याचा वेगळा प्रवास सुरु होतो. लग्न हे वयात होणे योग्य आहे, असे सर्व सांगतात, पण लग्नाआधी स्वतः सक्षम व्हावं. प्रत्येकानं करियरमध्ये सक्षम होणं महत्त्वाचं आहे. हुंडाप्रथेला बळी न पडता त्याचा विरोध करावा. जोडीदार निवडताना सौंदर्य, पैसा न पाहता माणूस म्हणून विचार करावा. तो आपला, आपल्या कुटुंबाचे रक्षण, आणि आदर-सन्मान करणारा हवा.
-ऋतिका पवार, (एम. ए. अर्थशास्त्राची विद्यार्थिनी)
स्वावलंबी होणं आवश्यक
लग्न हा खूप नीटपणे हाताळण्याचा विषय आहे. हल्ली लग्नाविषयी समाजात ज्याप्रकारच्या गोष्टी घडत आहेत, ते बघता लग्नसंस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जोडीदार हा आधी चांगला मित्र किंवा मैत्रिण बनणे गरजेचं असतं. हुंडा देणं आणि घेणं ही गोष्टच मुळी नष्ट करण्याची गरज आहे. परंपरेच्या नावाखाली मुलीचा सरळ व्यवहार केला जातो. मी हुंडा देणार नाही आणि घेणारही नाही हे मुलाने आणि आवश्यक असतं. कधी काय प्रसंग ओढवेल सांगता येत नाही. मुलीनेच ठामपणे सांगणं गरजेचं आहे. लग्नाआधी आणि नंतरही मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप
-श्रेया निकम (मुक्त पत्रकार)
नात्यात प्रामाणिक अपेक्षा
जोडीदार निवडताना मी त्याचे विचार पाहीन. त्याचे आदर प्रेम, नाती सांभाळण्याची समज या गोष्टी पाहीन. हुंडा ही अन्यायकारक, बेकायदेशीर प्रथा आहे. अशा प्रथेवर नकारात्मक भूमिका ठामपणे मांडणे आणि अशांना नकार देईल. सतत त्रास होत असेल तर त्या नात्यातून बाहेर निघणे चांगले.
- सायली कांबळे (एम. ए. अर्थशास्त्राची विद्यार्थिनी)
समतेच्या नात्याचा स्वीकार
हुंड्याची मागणी करणाऱ्याला मी कायदा सांगून शिक्षेची तरतूद आहे याची आठवण करून देईन. मुलीच्या आयुष्यातही लग्नानंतर शिक्षण, करिअर यावर फारसा फरक पडू नये. जोडीदाराकडे प्रॉपर्टी नसला तरी चालेल पण तो निर्व्यसनी, प्रामाणिक असावा. मानसिक किंवा शारीरिक त्रास झाल्यास पोलिस यंत्रणेला कळवावे.
-कृष्णा परळकर (स्पर्धा परीक्षा विद्यार्थी)
लग्नासाठी सजगता हवी
लग्नासाठी वय हा फक्त आकडा आहे. खरं तर एखादी व्यक्ती स्वतंत्रपणे विचार करू शकते, स्वतंत्रपणे विचार करू शकते, निर्णय घेऊ शकते, जबाबदारी स्वीकारू शकते, तेव्हा लग्नासाठी ती योग्य वेळ असते. स्वयंपूर्ण, सक्षम वाटेल, तेव्हाच लग्नाचा विचार करेन. कुणी हुंडा मागत असेल तर मी नकार देईन. आदर आहे तिथेच प्रेम करा. स्वावलंबी झाल्याशिवाय आयुष्य कुणाच्या हातात सोपवू नका.
- सानिका साळीकराम, (पदवी अभ्यासक्रमाची विद्याथिर्नी)
आधी शिक्षण, करिअर
लग्नानंतर शिक्षण किंवा करियर यांना पाठबळ देणारा सहकारी असावा. शिक्षण पूर्ण करून आणि हवी तशी कामाला सुरुवात केल्यानंतर लग्नाचा विचार करेन. असंख्य मुलींना छळ सहन करावा लागतो. हुंडा घेणारे आणि देणारे दोषी असतात. शिकलेल्या मुली घरच्यांची लुबाडणूक खपवून कशी काय घेतात?
-वैष्णवी पाटील (पदवी अभ्यासक्रमाची विद्याथिर्नी)