रेल्वेमध्ये रंगणार ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:55 IST2025-02-16T13:54:36+5:302025-02-16T13:55:09+5:30

फिरत्या चाकांवर प्रथमच उपक्रम : रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव

Marathi Sahityatri Sammelan to be held in the railway | रेल्वेमध्ये रंगणार ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

रेल्वेमध्ये रंगणार ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

पुणे : ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीमध्ये होत आहे. त्यासाठी पुण्यातून विशेष रेल्वे जाणार असून, त्या रेल्वेमध्ये प्रथमच ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ रंगणार आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दीर्घ साहित्य संमेलन असेल.

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरणार आहे. साहित्य रसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून, प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत.

राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’ सहभागी होत रेल्वेतून प्रवास करणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सरहद पुणेचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी शनिवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत दिली. सरहद पुणेचे अध्यक्ष संजय नहार, शरद तांदळे, वैभव वाघ, शरद गोरे उपस्थित होते.

दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे दि. १९ रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून, दि. २० रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे.

‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’ महाराष्ट्रातील विविध गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने समावेश असणार आहे. दि. १९ रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली जाणार आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वे प्रवासात १२०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून, जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत.

रेल्वेतील संमेलनासाठी रावण आंत्रप्रिन्युअर या पुस्तकांचे लेखक शरद तांदळे यांची संमेलनाध्यक्ष तर वंदेमातरम् संघटनेचे अध्यक्ष व व्हायरल माणुसकी या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. 

Web Title: Marathi Sahityatri Sammelan to be held in the railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.