मराठीचे झाले आता थोडे महापालिका निवडणुकीचे पाहू; शिव-मन सैनिकांची भावना, युतीबाबत अनिश्चितताच
By राजू इनामदार | Updated: June 30, 2025 17:12 IST2025-06-30T17:08:38+5:302025-06-30T17:12:03+5:30
एकत्र येत मराठी भाषेचा लढा यशस्वीपणे लढला, आता महापालिका निवडणुका जिंकायच्या तर असेच एकत्र रहायला हवे, शिव-मन सैनिकांची भावना

मराठीचे झाले आता थोडे महापालिका निवडणुकीचे पाहू; शिव-मन सैनिकांची भावना, युतीबाबत अनिश्चितताच
पुणे : ‘एकत्र येत मराठी भाषेचा लढा यशस्वीपणे लढला, आता महापालिका निवडणुका जिंकायच्या तर असेच एकत्र रहायला हवे’ अशीच बहुसंख्य शिवसैनिक (उद्धव ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांची भावना आहे. मात्र दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी याबाबत अद्याप काहीही भाष्य केले नसल्याने राज्यातील महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती होईल किंवा नाही याबाबत अजून अनिश्चितताच आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या त्रिभाषा सुत्रांतर्गत लागू केलेली हिंदी भाषेची सक्ती मराठी भाषेच्या मुळावर येत असल्याची तक्रार करत सर्वप्रथम मनसेने आवाज उठवला. त्याला शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची साथ मिळावी. ५ जुलैचा मोर्चा जाहीर झाला, त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष वगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवणार असल्याचे जाहीर केले. त्याशिवाय कलाकार, साहित्य संस्था, संघटना यांनीही मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. सरकारमध्ये सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मत व्यक्त केले.
हा रोष लक्षात घेत अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने यासंबंधी जारी केलेले दोन्ही अध्यादेश रद्द करत असल्याचे जाहीर केले. मनसे व शिवसेना यांच्या एकत्रिकरणामुळेच हा निर्णय सरकारला घ्यावा लागला असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता महापालिका निवडणुकांसाठीही अशीच युती व्हावी असे त्यांना वाटते. स्वतंत्र लढून शक्ती वाया घालवण्यापेक्षा समान मुद्द्यावर एकत्र लढलो तर यश मिळेल अशी खात्री दोन्हीकडच्या अनेकांना वाटते आहे.
राज्यातील २९ महापालिकांमध्ये निवडणूक आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती यांच्याही निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी यांना बराच रस असतो. त्यातही मनसेकडून मागील काही वर्षात अशी स्थानिक राजकीय चाचपणीच झालेली नाही. त्यामुळे त्यांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात निवडणुकीसाठी बराच उत्साह आहे. शिवसेनेलाही फुटीनंतर आपले राजकीय अस्तित्व दाखवून द्यायचे आहे.
मनसेमध्ये राज ठाकरे व शिवसेनेत उद्धव ठाकरे हेच सर्वेसर्वा आहेत. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर त्यांनी यावर अद्याप काहीही भाष्य केलेले नाही. अध्यादेश मागे घेतले गेल्यानंतर ५ जुलैला मुंबईत काढणारा मोर्चा रद्द करून मुंबईतच विजयी मेळावा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले असले तरी त्याचा तपशील अद्याप सांगितला गेलेला नाही. हा मेळावा मोर्चाप्रमाणेच राजकीय पक्षमुक्त असणार आहे. त्यामुळे मेळावा झाला तरीही महापालिका निवडणुकीसाठी वेगळा, स्वतंत्र राजकीय निर्णय घ्यावा लागणार आहे. तो कधी होणार याची प्रतिक्षा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहे.
मनसेबरोबर राहून समान जागांवर लढता येईल
सध्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याबरोबर आहे. मनसेला बरोबर घेण्याला त्यांचा नकार असू शकतो, मात्र मविआत राहून जागांचा कमीपणा घेण्यापेक्षा मनसेबरोबर राहून समान जागांवर लढता येईल असाही विचार काही पदाधिकारी करत आहेत.
मनसेमधील राजकीय निर्णय राज ठाकरे स्वत: घेत असतात. हिंदी सक्तीला विरोध हे वेगळा विषय व महापालिका निवडणुकांसाठी युती हा वेगळा विषय आहे. यासंबधीच ते स्वत: काही जाहीर करतील, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होईल.- बाबू वागसकर, संपर्क नेते
हिंदी सक्तीविरोधात राज्यातील समस्त मराठी माणूस उभा राहिला. मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र यासाठीच शिवसेनेचा जन्म आहे. आमचे नेते उद्धव ठाकरे यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील याचा आम्हाला विश्वास आहे.- संजय मोरे, शिवसेना, शहरप्रमुख