Ajit Pawar: टीका करणाऱ्यांना करू द्या, आपण त्यांना कामातूनच उत्तर देऊ; अजित पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:39 IST2025-12-19T12:35:13+5:302025-12-19T12:39:39+5:30
विकासकामांवर बोलताना, केवळ भाषणांनी किंवा गोड बोलण्याने विकास होत नाही. विकासासाठी सर्वांची साथ आणि समन्वय आवश्यक असतो

Ajit Pawar: टीका करणाऱ्यांना करू द्या, आपण त्यांना कामातूनच उत्तर देऊ; अजित पवार स्पष्टच बोलले
बारामती : निवडणुका जवळ आल्या की काहीजण अचानक सक्रिय होतात. संविधानाने निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला असला, तरी पाच वर्षे हे लोक कुठे होते, त्यांनी सामान्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा नामोल्लेख टाळत उपस्थित केला.
बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, शहरात अपघात टाळण्यासाठी काही ठिकाणी दुभाजक उभारले तरी त्यावर नाराजी व्यक्त केली जाते. १९६७ साली बारामतीत अवघे १७ हजार मतदार होते, आज ही संख्या सातपट वाढली आहे. लोकसंख्या वाढली की रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि अन्य विकासकामे करावीच लागतात. ही कामे केली तरी टीका होते आणि केली नाहीत तरी टीका होते. याचा विचार बारामतीकरांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
काम करताना काही त्रुटी राहू शकतात, आपण सर्वगुणसंपन्न असल्याचा दावा करत नाही, असे स्पष्ट करत पवार म्हणाले, मात्र बारामतीकरांसाठी जे प्रामाणिकपणे आणि बारकाईने काम केले आहे, ते कोणीही करून दाखवू शकणार नाही. काहीजण भावनिक मुद्दे काढतात; मात्र मी प्रत्येक धर्माचा आदर करणारा असून शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतूनच कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
बारामतीतील जातीय सलोखा कायम राखण्याचे आवाहन करताना पवार म्हणाले, निवडणुका आल्या की आरोप-प्रत्यारोप होतात. मात्र मला टीकेपेक्षा कामातून उत्तर देण्यावर अधिक विश्वास आहे. टीका करणाऱ्यांना टीका करू द्या, आपण त्यांना कामातूनच उत्तर देऊ, असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी विकासकामांवर बोलताना, केवळ भाषणांनी किंवा गोड बोलण्याने विकास होत नाही. विकासासाठी सर्वांची साथ आणि समन्वय आवश्यक असतो, अशी टीका त्यांनी शरद पवार गटाचे नाव न घेता केली. इतर लोक येऊन आश्वासनांची खैरात करतील; मात्र बारामतीचा सर्वांगीण विकास कसा साधायचा, हे सांगण्यासाठी आपण जनतेसमोर उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे काम करण्याची क्षमता इतर कोणाकडे नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.