Lawrence Bishnoi | सलमान खान धमकी पत्राची महाकालला होती माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 18:16 IST2022-06-13T18:12:49+5:302022-06-13T18:16:39+5:30
पॅन इंडियात बिष्णोई टोळीचा संपर्क...

Lawrence Bishnoi | सलमान खान धमकी पत्राची महाकालला होती माहिती
पुणे : अभिनेता सलमान खान याला धमकीचे पत्र देण्यात येणार असल्याचे माहिती असल्याची कबुली सौरभ महाकाल ऊर्फ सिद्धेश कांबळे याने पुणे पोलिसांकडे दिली आहे. त्याच्याकडे पंजाब तसेच मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशी केली आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्याकडे मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशी केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक सध्या दिल्लीत असून ते बिष्णोईकडे चौकशी करणार आहे. तसेच संतोष जाधव याच्याकडेही बिष्णोई टोळीशी त्याचा कसा संबंध आला, याचा तपास केला जाणार आहे.
सौरभ महाकाल याला गेल्या आठवड्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्यानंतर गेले चार दिवस त्याच्याकडे पंजाब, मुंबई पोलिसांबरोबरच ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली. त्यात त्याने पंजाब, हरियाणा येथे रेकी केल्याचे सांगितले. तसेच राजस्थान, दिल्ली येथे संतोषबरोबर काम केल्याचे महाकाल सांगतो. सलमान खान यांच्या धमकी पत्राबाबत आपल्याला माहिती असल्याचे तो सांगतो. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा विक्रम ब्रार याच्याशी महाकाल याचा संतोष जाधवमार्फत संपर्कात होता. महाकाल याने दिलेली माहिती संतोष जाधवच्या चौकशीत पडताळून पाहण्यात येणार आहे. त्यातून संतोष जाधव व इतरांचा मुसेवाला हत्येप्रकरणी किती संबंध होता, यावर अधिक प्रकाश पडणार आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित ७ ते ८ वेगवेगळी माहिती हाती आली आहे. त्याचा तपास सुरु आहे.
पॅन इंडियात बिष्णोई टोळीचा संपर्क
बिष्णोई टोळीचा संपूर्ण देशभरात नेटवर्क आहे. त्यात अनेक जण एकमेकांना ओळखतही नाही. त्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क आहे. अन्य राज्यातील पोलीस दलाशी समन्वयातून याची माहिती पोलीस घेत आहे.
इन्स्ट्राग्राममार्फत महाकाल होता संपर्कात
सौरभ महाकाल हा इन्स्ट्राग्राममार्फत बिष्णोई टोळीशी संपर्कात होता. त्यावरुन पोलिसांना अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.
घटना पंजाबात, कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांची
मुसेवाला हत्येची घटना पंजाबात घडली असली तरी मीडियातील बातमीनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यातील संशयित तिघांना आतापर्यंत पकडले आहे.
सलग २५ तासांचा प्रवास
शनिवारी रात्री संतोष जाधव व सूर्यवंशी याला मांडवी येथे पकडण्यात आले. ग्रामीण पोलिसांच्या दोन पथकांनी दोघांना वेगवेगळ्या गाडीतून सलग २५ तास प्रवास करुन रविवारी रात्री पुण्यात आणले.