कृषी विकास प्रतिष्ठानची 'लॅब' विज्ञान क्षेत्रात नवी पिढी तयार करण्यास उपयुक्त : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 19:14 IST2025-06-29T19:13:15+5:302025-06-29T19:14:10+5:30

- कृषी विकास प्रतिष्ठानच्या सायन्स पार्कमध्ये राजीव गांधी सायन्स ॲण्ड टेक्नाॅलाॅजी कमिशनच्या वतीने 'तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रयोगशाळा' व 'विज्ञान आणि नवं संशोधन केंद्रा'चे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Krishi Vikas Pratishthan lab is useful in creating a new generation in the field of science: Sharad Pawar | कृषी विकास प्रतिष्ठानची 'लॅब' विज्ञान क्षेत्रात नवी पिढी तयार करण्यास उपयुक्त : शरद पवार

कृषी विकास प्रतिष्ठानची 'लॅब' विज्ञान क्षेत्रात नवी पिढी तयार करण्यास उपयुक्त : शरद पवार

बारामती : बारामती येथे कृषी विकास प्रतिष्ठानने उभारलेली लॅब विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवी पिढी तयार करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आज हा नवीन प्रकल्प हातामध्ये घेतला आहे. त्यामुळे अधिक गुणवत्ता आणि दर्जा वाढेल. भावी पिढी आत्मविश्वासाने भारलेली अशी तयार होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. कृषी विकास प्रतिष्ठानच्या सायन्स पार्कमध्ये राजीव गांधी सायन्स ॲण्ड टेक्नाॅलाॅजी कमिशनच्या वतीने 'तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रयोगशाळा' व 'विज्ञान आणि नवं संशोधन केंद्रा'चे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागात आधुनिक विज्ञानाची ओळख करून देणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे हे सेंटर राज्यासाठी पथदर्शी ठरेल, याबाबत तीळमात्र शंका नाही. राज्यातील १००० शिक्षकांना हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. भविष्यातील काळ ‘एआय’चा असेल. राज्य सरकार याबाबत नवीन धोरण आखत आहे. नव्या पिढीला रोजगार संधी देण्यासाठी मुंबईत २५० एकरांवर ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्यात येत आहे. भारतीय मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज भासू नये यासाठी राज्य सरकारने पाच परदेशी विद्यापीठांबरोबर करार करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर म्हणाले, आजच्या कार्यक्रमात विद्यार्थी यांनी पेटंटचा पाऊस पाडला. एवढ्या मोठ्या संख्येने पेटंटचा पाऊस पडणारा कार्यक्रम यापूर्वी पाहिलेला नाही. अशी शिक्षण क्रांती देशात झाल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नसल्याचे काकोडकर म्हणाले. विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार म्हणाले, आज सुरू केलेला प्रकल्प राज्यातील इतर प्रकल्पांसाठी पथदर्शी ठरणार आहे. परदेशाप्रमाणे आधुनिक सुविधा ग्रामीण भागात देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजच्या प्रकल्पामुळे भविष्यात संशोधक उद्योजक घडविण्यास मदत होइल, असे चेअरमन राजेंद्र पवार म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे सीइओ गजानन पाटील, संस्थेचे सीइओ नीलेश नलवडे, डाॅ. रजनी इंदुलकर, नरेंद्र शहा, नरेंद्र देशमुख, उमेश रस्तोगी, आदी उपस्थित होते.

Web Title: Krishi Vikas Pratishthan lab is useful in creating a new generation in the field of science: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.