कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा, साडेतीन किमीच्या रस्त्यावर ५ वर्षांत ५० हुन अधिक अपघात, २५ बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:44 IST2025-12-16T10:43:44+5:302025-12-16T10:44:34+5:30
आता भूसंपादनामुळे पांढरा हत्ती ठरलेल्या आणि दीर्घकाळ रेंगाळलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे

कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा, साडेतीन किमीच्या रस्त्यावर ५ वर्षांत ५० हुन अधिक अपघात, २५ बळी
पुणे : पुणे शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. त्यात या रस्त्यावर वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहतूककोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या रस्त्यावर गेल्या पाच वर्षांत या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर ५० हून अधिक अपघात होऊन त्यात २५ बळी गेले आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका शिक्षिकेचा अपघात झाला. त्यामुळे या रस्त्यावरील अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कात्रज-कोंढवा ८४ मीटरचा डीपी रोड आहे. या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली आहे. हा रस्ता राजस सोसायटी ते खडी मशिन चौक ते पिसोळी पालिका हद्दीपर्यंत आहे. या रस्त्यांचे काम २४१ कोटींचे असून आतापर्यंत ४८ कोटी रुपये खचे झाले आहेत. या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी ७१० कोटींची आवश्यकता होती. पण भूसंपादन न झाल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. राजस सोसायटी ते कपिलामृत डेअरीपर्यंत रस्ता झाला आहे. त्यापुढे या रस्त्याचे काम झालेले नाही. खडी मशिन चौकाच्या अलीकडे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. पण त्यापुढेही काम झालेले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याचे काम कुठेच सलग न झाल्यामुळे नागरिकांना याचा फारसा फायदा होत नाही. त्यातच आता भूसंपादनामुळे पांढरा हत्ती ठरलेल्या आणि दीर्घकाळ रेंगाळलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पूर्वीच्या ८४ ऐवजी आता त्याची रुंदी ५० मीटर केली जाणार आहे. यामध्ये सेवा रस्त्याचा समावेश असला, तरी सायकल ट्रॅक, पदपथ तसेच वृक्षारोपणासाठीचा 'ग्रीन ट्रॅक' वगळण्यात आले आहे. पण अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. कात्रज चौक ते खडी मशीन चौक या साडेतीन किलोमीटरच्या मार्गात एकूण ५५ अपघात झाल्याची नोंद भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यात २५ जणांचा बळी गेला आहे.