कोण कशाला कशासाठी भेटतंय, याची माहिती नाही; राज अन् फडणवीस यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची टीका
By राजू इनामदार | Updated: June 14, 2025 20:53 IST2025-06-14T20:51:20+5:302025-06-14T20:53:51+5:30
आम्हाला साद आली, त्याला आम्ही प्रतिसाद दिला आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच व्हायला पाहिजे

कोण कशाला कशासाठी भेटतंय, याची माहिती नाही; राज अन् फडणवीस यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची टीका
पुणे : कोण कोणाला कशासाठी भेटतंय ते माहिती नाही. आम्हाला साद आली, त्याला आम्ही प्रतिसाद दिला आहे. जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच व्हायला पाहिजे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसेचे राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या भेटीवर टीका केली.
कब्बडी स्पर्धेच्या उदघाटनासाठी म्हणून पुण्यात बालेवाडीत शनिवारी सायंकाळी आलेल्या आदित्य यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. राज व फडणवीस यांच्या भेटीवर त्यांनी नाव न घेता टीका केली. महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही वागायला तयार आहोत असे सांगितले. राज्य सरकारलाही त्यांनी लक्ष्य केले. लाडक्या बहिणींकडून राख्या बांधून घेतल्या. त्यांना पैसे दिले. निवडणूक जिंकल्यावर आता किती लाख लाडक्या बहिणींची नावे यादीतून कमी केली याचा त्यांनीच विचार करावा. आता तर ते पैसे खात्यावर गेले त्यांची चौकशीही करणार आहोत. चूक तुमची आहे तर बहिणींना दोष कसा व का देता? असा प्रश्न आदित्य यांनी केला. कर्ज माफी करण्याचे आश्वासन त्यांच्या निवडणूक जाहिरनाम्यात होते. आता सत्तेवर आल्यावर ते म्हणतात आम्ही असे कधी म्हणालो. विश्वास ठेवावा असे हे सरकार आहे का याचा जनतेनेच विचार करावा.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी नाही. ते अलिबाबा व चाळीस चोर आहेत. समृद्धी महामार्गावर त्यांनी खुर्च्यां अदलून बदलून प्रवास केला. मात्र यातून काय साध्य होणार? जमिनीवर काय चालले आहे हे त्यांना कळणार आहे का? असा प्रश्न आदित्य यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत, तरीही हे सरकार त्या निवडणुका घेईल की नाही याची खात्री नाही असे आदित्य म्हणाले.