मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र
By राजू इनामदार | Updated: June 12, 2025 18:57 IST2025-06-12T18:56:33+5:302025-06-12T18:57:27+5:30
समिती स्थापन केल्यावर अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करावे किंवा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी’

मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र
पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत बरेच गैरप्रकार झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. त्यांच्या या आरोपांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेसने राज्यात मशाल मोर्चांचेही आयोजन केले आहे. आता माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचा पाठपुरावा करत थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनाच त्यासंबधी पत्र पाठवले आहे.
‘गांधी यांनी आकडेवारीनिशी आरोप केले आहेत. त्यांचे निराकरण करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, मात्र ते काहीही बोलत नाहीत, त्याऐवजी केंद्र व राज्यातील सरकारमध्ये असलेले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी याला उत्तर देत आहे. तुम्ही देशाच्या सर्वोच्च अशा घटनात्मक पदावर आहात, त्यामुळेच तुम्हीच याची दखल घ्यावी. आरोपांच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करावी, तसेच समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करावे किंवा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी’ अशी मागणी पटोले यांनी पत्रात केली आहे.
नाना पटोले सन २०१४ मध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले खासदार होते. पंतप्रधान मोदी यांची धोरणे पटत नसल्याची टीका करून त्यांनी सन २०१७ मध्ये खासदार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते विधानसभेचे अध्यक्ष होते. त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले, मात्र नाना पटोले अल्प मतांनी विजयी झाले. त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सध्या ते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहापासून थोडे बाजूला असून प्रसिद्धीत राहण्यासाठी तसेच राहुल यांच्याबरोबर जवळीक साधण्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचा प्रकार केला असल्याचे काँग्रेसमध्येच बोलले जात आहे.