'अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी करा', बारामतीकर एकवटले; 'प्रशासकीय भवना'वर धडक देत निवेदनाद्वारे केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:12 IST2026-02-23T13:03:40+5:302026-02-23T13:12:17+5:30
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून होत आहे. काल लोणी भापकर येथील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून आपला निषेध नोंदवला.

'अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी करा', बारामतीकर एकवटले; 'प्रशासकीय भवना'वर धडक देत निवेदनाद्वारे केली मागणी
बारामती- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज बारामतीमधील शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते प्रशासकीय भवन येथे एकवटले असून त्यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून होत आहे. काल लोणी भापकर येथील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून आपला निषेध नोंदवला.
दोन दिवसांपूर्वी बारामतीतील सर्व प्रमुख सहकारी संस्थांनी एकत्र येत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती.
प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन
आज प्रशासकीय भवनासमोर जमलेल्या नागरिकांनी एकजुटीने घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर नागरिकांच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. "अजितदादा हे केवळ आमचे नेते नव्हते, तर बारामतीचा आधार होते. त्यांच्या अपघाताची चौकशी तातडीने सुरू झाली पाहिजे आणि त्यातील सत्य जनतेसमोर आले पाहिजे," अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
विमान अपघाताच्या तपासात होणारा उशीर आणि ब्लॅक बॉक्सबाबत समोर येणारी माहिती यामुळे लोकांमध्ये संशय निर्माण होत आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा सखोल तपास होत नाही, तोपर्यंत बारामतीकर स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.