निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष
By राजू इनामदार | Updated: April 29, 2025 18:52 IST2025-04-29T18:52:30+5:302025-04-29T18:52:56+5:30
कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष करून या निकालाचे स्वागत केले, स्वत: कलमाडी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणालाही भेटले नाही

निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष
पुणे: एकेकाळचे शहराचे सर्वेसर्वा असलेले काँग्रेसचे नेते, माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी त्यांच्यावर राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपातून मुक्त झाले. सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्यावरचे सर्व आरोप मागे घेतले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष करून या निकालाचे स्वागत केले, स्वत: कलमाडी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणालाही भेटले नाही.
कलमाडी पुणे शहराचे निवडून आलेले खासदार होते. पुणे फेस्टिवल, पुणे मॅरेथॉन अशा उपक्रमांमधून त्यांनी पुणे शहराला आंतरराष्ट्रीय नकाशात कायमचे स्थान मिळवून दिले होते. तब्बल १५ वर्षांनंतर सोमवारी (दि.२८) त्यांच्यावरच्या सर्व आरोपांमधून ते निर्दोष बाहेर पडले. मंगळवारी त्यासंबधीच्या बातम्या येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना व पत्रकारांनाही सांगण्यात आले.
तरीही काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या कलमाडी हाऊस या कर्वे रस्त्यावरील निवासस्थानासमोर फटाके वाजवले. सचिन आडेकर, संदीप मोकाटे, राजू मगर, नरेंद्र काते, भगवान कडू, संताजी खामकर, अण्णा गोसावी, आबा जगताप, अतूल गोंजारी यांचा त्यात समावेश होता. त्यांनी सांगितले की त्यांना आराम मिळावा म्हणून आम्हीही भेटीसाठी आग्रह धरला नाही. १ मे ला त्यांचा वाढदिवस आहे. त्यादिवशी भेटून आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ. कलमाडी यांचे क्रिडाक्षेत्रातील निकटचे सहकारी ॲड. अभय छाजेड, त्यांच्या विविध उपक्रमातील सहकारी संगिता तिवारी यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली.
या आरोपांमुळे कलमाडी यांची वेगात व भरातही असलेली राजकीय कारकिर्द झाकोळली. त्यातच काँग्रेस पक्षाने याच आरोपांवरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर कलमाडी जवळपास राजकीय विजनवासात गेले होते. पुणे फेस्टिवल वगळता ते पुण्याच्या सार्वजनिक कार्यक्रमात गायबच झाले होते. शहराच्या विकासासंबधी काहीही समस्या निघाली की बहुसंख्य राजकीय कार्यकर्त्यांकडून आत्ता कलमाडी पाहिजे होते असे बोलले जात असते. काँग्रेसच्या शहर शाखेला तर त्यानंतरच उतरती कळाच लागली असल्याचे काँग्रेसचेच कार्यकर्ते सांगत असतात.
भारतीय जनता पक्षानेच त्या काळात अनेक कटकारस्थाने करून कलमाडी यांच्यावर किटाळ आणले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही त्यांनी असाच त्रास दिला. मात्र अखेर सत्यमेव जयते हेच खरे ठरले. कलमाडी यांच्यावरील आरोप निराधार ठरल्याने भाजपचेच पितळ उघडे पडले आहे.- मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस