पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 14:14 IST2025-06-08T14:02:43+5:302025-06-08T14:14:08+5:30
जालिंदर सुपेकरांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले,"ज्या आरोपांमध्ये तथ्य असेल, पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल.

पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलतांना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात सध्या एशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प सुरू असून तो 2026 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील ऊर्जा गरजा भागवण्यात मोठी मदत होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात सध्या 5 लाख सौर पंपांची गरज आहे आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सर्व सरकारी महत्त्वाच्या इमारतींनी सौरऊर्जेकडे वळले पाहिजे, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. हायड्रोजन क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी विशेष उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले. हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे आणि या क्षेत्रात महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. असे फडणवीस म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी जालिंदर सुपेकरांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले,"ज्या आरोपांमध्ये तथ्य असेल, पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल. आम्ही कोणालाही वाचविणार नाही, पण बेबनाव आरोपांवर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. असं म्हणत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
सामाजिक विभाग निधीबाबत स्पष्टीकरण
सामाजिक विभागाच्या निधीविषयी आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आपल्या बजेटच्या नियमानुसार, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी असलेल्या योजना त्या विभागाच्या हेडखालीच टाकाव्या लागतात. त्यामुळे इतर कुठल्या विभागाकडून पैसे वळवलेले नाहीत. अजितदादांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले आहे की यावेळी अधिक तरतूद करण्यात आली आहे आणि ही तरतूद पूर्वीपेक्षा जास्त आहे. पैसा कुठेही वळवलेला नाही; त्याच विभागांमध्ये योग्य प्रकारे खर्च करण्यात आला आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
सामना केल्या जाणाऱ्या टीकेबाबत फडणवीसांचा रोखठोक सवाल
‘सामना’ या वृत्तपत्रावर टीका करत फडणवीस म्हणाले, सामना कोणती सर्टिफिकेट देणारी संस्था आहे का? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सामना होता. असं म्हणत टीका केली.