समाजाचं हित असेल तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:20 IST2025-06-22T17:19:52+5:302025-06-22T17:20:21+5:30
कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो, ही गोष्ट विसरायला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

समाजाचं हित असेल तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते - शरद पवार
पुणे : नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था या सगळ्या ठिकाणी महिलांना आरक्षण दिले. लोकांना सुरुवातीला पटलं नव्हतं, पण शेवटी लोकांनी ते मान्य केलं. कोणतेही बदल हिताचे करायचे असतात, नाराजी असते, पण समाजाचं हित असेल, तर ती नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते. लोकांची मानसिकता बदलली असं सांगता येणार नाही. स्त्री आणि पुरुष कर्तृत्वाच्या बाबतीत कुठेही कमतरता नाही. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो, ही गोष्ट विसरायला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महिला धोरणाची त्रिदशकपूर्तीनिमित्त रविवारी यशस्विनी सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे , लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, धैयकन्या आसावरी जगदाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे आदी उपस्थित होते. यशस्विनी सन्मान पुरस्कार कृषी क्षेत्रातील मनीषा सजनपवार, साहित्यक्षेत्रातील डॉ. श्यामल गरुड, उघोग क्षेत्रातील कमल कुंभार, सामाजिक क्षेत्रातील उल्का महाजन, क्रीडा प्रशिक्षक क्षेत्रातील डॉ. शबनम शेख, पत्रकारिता क्षेत्रातील अलका धुपकर यांना देण्यात आला.
शरद पवार म्हणाले, महिलांसंदर्भात देशातील पहिलं धोरण हे महाराष्ट्रात तयार केलं गेलं. पण निर्णय घेताना अनेक वेळेला कुठे ना कुठेतरी विरोध होत होता. मानसिकता बदलायची आवश्यकता होती. समाजातल्या पुरुषवर्गाची ती मानसिकता त्या काळात बदलली नव्हती. हल्ली सुद्धा तीच मानसिकता आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळते. त्यातलं एक एक कलम, तरतूद याच्यासाठी तासन्तास चर्चा करावी लागली. त्याला ज्यांचा विरोध आहे त्यांना समजावून सांगावं लागलं. काही कायद्यात दुरुस्ती करावी लागली. काही लहान प्रश्नांबाबतीतसुद्धा काही पुरुषांची मानसिकता ही बदल स्वीकार करायची नसते. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध होतो. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये हा कायदा आपण केला. महिलांना अधिकार दिले ते निव्वळ या कायद्याने प्रॉपर्टीत नाही तर सत्तेमध्ये सुद्धा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये महिलांना अधिकार देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात दिला. लोकांची मानसिकता बदलली असं सांगता येणार नाही. स्त्री आणि पुरुष कर्तृत्वाच्या बाबतीत कुठेही कमतरता नाही.
कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो, ही गोष्ट विसरायला पाहिजे. संधी मिळाली तर स्त्रीसुद्धा पडेल ती जबाबदारी घेऊ शकते. साधी गोष्ट आहे जुन्या पिढीतल्या लोकांना एक प्रश्न विचारला की, १९४७ सालापासून आजपर्यंत तुम्हाला देशामध्ये प्रभावीपणे निर्णय घेणारा प्रधानमंत्री कोण वाटतो? तर त्यांच्याकडून उत्तर येईल ‘इंदिरा गांधी’. इंदिरा गांधी यांनी कर्तृत्व दाखवलं, देश चालवण्यासंबंधीची दृष्टी दाखविली. महिला हे करू शकतात, हा इतिहास त्यांनी घडविला. त्यामुळे कर्तृत्व हे दोघांच्यातही असतं असे शरद पवार यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, धैयकन्या आसावरी जगदाळे, मनीषा सजनपवार, डॉ. श्यामल गरूड, कमल कुंभार, उल्का महाजन, डॉ. शबनम शेख, अलका धुपकर यांची भाषणे झाली.