बारावी परीक्षेत पाचव्या दिवशी काॅपीच्या २ घटना; फक्त चाैथा पेपर ठरला निरंक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 12:50 IST2026-02-15T12:49:05+5:302026-02-15T12:50:31+5:30
-राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण नऊ विभागांत परीक्षा घेतली जात आहे

बारावी परीक्षेत पाचव्या दिवशी काॅपीच्या २ घटना; फक्त चाैथा पेपर ठरला निरंक
पुणे : राज्यात इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असून, पाचव्या दिवशीही काॅपीचा प्रकार समाेर आला आहे. वाणिज्य संघटन व व्यवस्थापनाचा पेपर हाेता. अपवाद चाैथ्या पेपरचा वगळता चारही दिवस काॅपी करण्याचा प्रकार घडला. सर्वच विभाग काॅपी प्रकरणात निरंक ठरलेल्या चाैथ्या दिवशी सकाळच्या सत्रात महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत; तर दुपारच्या सत्रात अर्धमागधी, रशियन आणि अरेबिक विषयाचा पेपर हाेता. आता साेमवारी (दि. १६) सकाळच्या सत्रात तर्कशास्त्र आणि भाैतिकशास्त्र विषयाचा पेपर असणार आहे.
राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण नऊ विभागांत परीक्षा घेतली जात आहे. राज्यात आतापर्यंत पहिल्या दिवशी अर्थात १० फेब्रुवारीला राज्यात काॅपीची ४२ प्रकरणे आढळून आली हाेती. दुसऱ्या दिवशी चार प्रकरणे उघड झाली.
तिसऱ्या दिवशीही काॅपीची ३० प्रकरणे उघड झाली. अपवाद चाैथा दिवस निरंक ठरला आणि पाचव्या दिवशी दाेन प्रकरणे उघड झाली. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना काॅपीमुक्त आणि तणावमुक्त पेपर देता यावा म्हणून राज्य दक्षता समिती, जिल्हा दक्षता समितीने आवश्यक उपाययाेजना केल्या आहेत.