राजगुरूनगर: रौंधळवाडी ( ता खेड ) या परिसरात भामा आसखेडधरणाच्या लगत मासेमारी करणाऱ्या युवकाच्या अंगावर वीज कोसळून जागीच मुत्यू झाला. संतोष गुलाब खंडवे (वय २७ वेताळे ता खेड ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
दि २६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. संतोष खंडवे हा मित्रासोबत रौंधळवाडी परिसरातील भामा आसखेड धरणाच्या लगत असणाऱ्या विरोबा वस्तीच्या ओढयात मासेमारी करण्यासाठी गेला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या भागात वादळी वाऱ्यासह वीजेचा गडगडाट सुरू झाला होता. यावेळी वीज अचानक वीज अंगावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोबाईलसह युवकाच्या अंगावरची कपडे जळून खाक झाले. शरीराची एक बाजू पुर्णपणे जळून गेली. मित्रांनी तात्काळ पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले. डॉक्टरांनी मृत्य घोषित केले.
घटनास्थळी पंचनामा मंडल अधिकारी एम ,एस सुतार, ग्राम महसूल अधिकारी एम.जी क्षीरसागर या घटनेचा पंचनामा केला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी ए. एन फुलपगर,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष जयसिंग दरेकर, माजी उपसरपंच दीपक डांगले, अनिल रौंधळ, विपुल खेंगले, कबीर रौंधळ, हरिभाऊ रौंधळ, नवनाथ डांगले आदी उपस्थित होते. पाईट परिसरात कमीत कमी पाच किलोमीटर अंतरापर्यंत रेंज असणाऱ्या वीज प्रतिबंधक टॉवर बसवण्याची मागणी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी केली आहे.