पूर्व हवेलीत आकर्षक परताव्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक; २ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 15:08 IST2021-07-03T15:06:17+5:302021-07-03T15:08:23+5:30
उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक बड्या हस्तींना सुमारे दोनशे कोटींहून अधिकची चा गंडा घातला असल्याची चर्चा....

पूर्व हवेलीत आकर्षक परताव्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक; २ जणांना अटक
लोणी काळभोर : भिशी व मुदत ठेवीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक प्रकरणी आणखी दोघांना ऊरूळी कांचन येथे ताब्यात घेतले आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या ५ झाली आहे.
अरूणकुमार चरणदास जोशी ( वय ६० ) व गोपाळ अरूणकुमार जोशी ( वय ३४, दोघे रा उरूळी कांचन, सुपर बॅटरीचे पाठीमागे ता. हवेली ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. यापुर्वी फसवणूक करुन ९ महिन्यापासुन फरार असणारे भरतकुमार चरणदास जोशी ( वय ६३) व त्यांचे मुले दिपक भरतकुमार जोशी ( वय ३६), हिरेन भरतकुमार जोशी ( वय ३४, तिघेही रा. शिर्के हॉस्पिटल जवळ, ऊरूळी कांचन मूळ रा. सहयोग नगर, भुज, कच्छ, गुजरात ) यांना पाकिस्तान सिमारेषा भुज, कच्छ ( गुजरात ) येथे जावून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकांने जेरबंद केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी फिर्यादी व इतर एकूण ११ जणांना ७ वर्षाच्या कालावधीवर मुदतीवर, आकर्षक रक्कम परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडुन वेळोवेळी बँकेच्या खात्यावरुन व आरटीजीएसने रक्कम घेत त्यांना कसल्याही प्रकारचा परतावा न देता तसेच त्यांनी गुंतवणुक केलेले पैसे परत न देता विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केली. तसेच काही लोकांची लिलावाच्या भिशीच्या नावाने पैसे धनादेश व रोखीने घेत त्यांना परत न देता त्यांनी सन २०१३ ते सन २०१९ या कालावधीमध्ये एकुण ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. परंतू भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली यांनी उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक बड्या हस्तींकडून सुमारे दोनशे कोटींहून अधिकची माया जमा केली असल्याची चर्चा आहे. यामुळे ज्या नागरिकांची वरील पध्दतीने फसवणूक झाली आहे. त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले आहे.