परदेशी शक्तींच्या मदतीने शेतकरी आंदोलन; स्थिर सरकार पाडण्यासाठी रचले षडयंत्र - शिव प्रकाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 09:41 IST2026-04-08T09:40:25+5:302026-04-08T09:41:18+5:30
आज काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली असून, देशविरोधी विचारसरणीला समर्थन देणारे लोक त्यांच्या नेतृत्वात आहेत,

परदेशी शक्तींच्या मदतीने शेतकरी आंदोलन; स्थिर सरकार पाडण्यासाठी रचले षडयंत्र - शिव प्रकाश
पुणे: “देशातील शेतकरी आंदोलन हे पूर्णतः परदेशी शक्तींच्या माध्यमातून घडवले गेले असून, स्थिर सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. या आंदोलनांना काँग्रेसकडून समर्थन मिळत आहे,’ असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिव प्रकाश यांनी केला.
भाजपच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित सक्रिय कार्यकर्ता संमेलनात शिव प्रकाश बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजूषा नागपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिव प्रकाश म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना काही मागण्यांपूर्वीच मदत करत आहेत. तरीही आंदोलन घडवून आणले जात आहे. देश सुरक्षित राहिला तरच विकास शक्य आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९८ साली घेतलेल्या अणुचाचणीच्या निर्णयामुळेच आज भारत संरक्षण क्षेत्रात मजबूत झाला असून, अनेक देशांना शस्त्र निर्यात करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘सिंदूर ऑपरेशननंतर भारताचा जागतिक स्तरावर दबदबा वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही समान नागरी कायद्याला पाठिंबा दिला आहे. उत्तराखंडसह काही राज्यांत तो लागू झाला असून, लवकरच संपूर्ण देशात लागू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आज काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली असून, देशविरोधी विचारसरणीला समर्थन देणारे लोक त्यांच्या नेतृत्वात आहेत,’ अशी टीकाही शिव प्रकाश यांनी यावेळी केली.