पुणे : तीन दिवस आम्ही दुबईत अडकलो होतो. १ मार्च रोजी ड्रोन पडल्याचे जवळून पाहिले; मात्र त्यानंतर परिस्थिती सामान्य होती. आम्ही विविध ठिकाणी फिरलो; कुठलीही युद्धजन्य परिस्थिती दिसून आली नाही. मंगळवारी विमानसेवा काही प्रमाणात सुरू झाल्यानंतर आम्ही विमानतळाकडे रवाना झालो. दुबईत अडकलेले पुण्यातील किशोर कुलकर्णी सांगत होते. युद्धजन्य परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांनंतर काही नागरिक दुबईतून मंगळवारी (दि. ३) परतले.
मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीमुळे पुणे जिल्ह्यातील १३५ जण दुबईत अडकले होते. यातील काही प्रवासी मंगळवारी परत आले आहेत. दुबईमध्ये सर्व काही सुरळीत असून, तेथे कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील एकूण १३५ नागरिकांबाबत माहिती मिळाली असून, संबंधित सर्व नागरिकांशी जिल्हा प्रशासन दूरध्वनीद्वारे संपर्कात आहे. ते सर्व भारतीय नागरिक सुरक्षित आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
दुबईवरून परत आलेले अनिल मनोरे म्हणाले, “एका खासगी टूर कंपनीमार्फत आठ जणांचा आमचा गट फिरण्यासाठी गेला होता. २८ फेब्रुवारी रोजी रात्री पुण्यात परत येणार होतो. मात्र, अबुधाबी येथे हल्ला झाल्याचे कळाल्याने विमान रद्द झाले. हॉटेलमध्ये आजूबाजूला काही आवाज येत होते; मात्र कोणतीही अनुचित घटना घडली नाही. टूर कंपनीने १ तारखेनंतरच्या वास्तव्याचे पैसे घेतले नाहीत; केवळ जेवणाचे पैसे आकारले.”
भगवान मनोरे म्हणाले, “दुबईत सर्व काही सुरळीत सुरू आहे. २४ तास हॉटेल व मॉल सुरू आहेत. घाबरण्याचे काही कारण नाही. आम्ही सुरक्षित होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून आम्हाला विमानाची तिकिटे देण्यात आली होती. मंगळवारी आम्ही मुंबईत सुखरूप पोहोचलो.”
पॅलेस्टाइन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबुधाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे.
अनावश्यक हालचाली टाळाव्यात आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे आणि आवश्यक असल्यास तत्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. केंद्र सरकार व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून राज्य सरकार नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्क आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता भासल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२०-२६१२३३७१ / २६१३३५२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.
Web Summary : Pune residents returning from Dubai report normalcy despite regional tensions. Stranded due to flight cancellations, they experienced no undue hardship. Government efforts ensured their safe return. District administration advises caution and offers helpline contact for citizens abroad.
Web Summary : दुबई से लौटे पुणे के निवासियों ने क्षेत्रीय तनाव के बावजूद सामान्य स्थिति बताई। उड़ान रद्द होने से फंसे, उन्हें कोई अनुचित कठिनाई नहीं हुई। सरकारी प्रयासों ने उनकी सुरक्षित वापसी सुनिश्चित की। जिला प्रशासन ने सावधानी बरतने की सलाह दी और विदेश में नागरिकों के लिए हेल्पलाइन संपर्क प्रदान किया।