लोणी काळभोर : तुमचा निर्णय पक्का असेल तर तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकता आणि कोणत्याही अडचणींवर मात करू शकता हे तुम्ही नेहमी ऐकले असेल, पण हे उदाहरण सत्यात उतरवले आहे. कदमवाकवस्ती येथील समर्थ वैरागकार याने.
कुटुंबाची अत्यंत हलाकीची परिस्थिती मुलांच्या शिक्षणासाठी धाराशिव जिल्हातून श्रीकांत वैरागकार कदमवाकवस्ती येथे राहण्यास आले. त्याठिकाणी रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा समर्थ हा कॉलेज करून बाकी वेळेत बॅटरीच्या दुकानात काम करून अवकाशाला गवसणी घालण्याचा स्वप्न बघत आहे. सोमवारी (दि. ५) लागलेल्या बारावीच्या निकालात समर्थने वाणिज्य विभागातून ८९.६७ टक्के मार्क पाडून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. या यशामुळे कदमवाकवस्ती परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. यावेळी बोलताना समर्थ म्हणाला की, मला मिळालेले गुण हे माझ्यासाठी कमीच असून मला जास्त गुणांची अपेक्षा होती. आई वडिलांचे कष्ट व आमच्या कुटूंबाची परिस्थिती यातून मला शिकण्यासाठी जिद्द मिळत आहे. मला आत्ता पुढील काळात सनदी लेखापाल या पदासाठी अभ्यास करायचंय यासाठी खूप अडचणी येणार असल्या तरी मी जिद्दीने अभ्यास करून यश प्राप्त करणार आहे अशी इच्छा समर्थ याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.