अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:17 IST2025-06-12T15:16:52+5:302025-06-12T15:17:55+5:30
रोहित्रावर बिगाड काढण्यासाठी पहाटे चढलेला असताना तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसून तो थेट भीमा नदीपात्रालगत असणाऱ्या गाळात कोसळला

अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना
राजगुरुनगर : विद्युत खांबावर चढून रोहित्रावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजेचा जोरदार धक्का लागुन एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना १२ जुन रोजी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास चांडोली येथे घडली. अजित शिवाजी टाकळकर (वय २८ ,रा टाकळकरवाडी ता खेड ) असे कंत्राटी कामगाराचे नांव आहे. या घटनेबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, चांडोली गावाच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्त्यालगत असणाऱ्या रोहित्रावर बिगाड काढण्यासाठी पहाटे अजित टाकळकर चढला होता. अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो थेट भिमा नदीपात्रालगत असणाऱ्या गाळात कोसळला. इतर सहकाऱ्यांनी तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अजित टाकळकर हे राजगुरूनगर उपविभागामध्ये गेली पाच वर्षे कंत्राटी कामगार म्हणून तुटपुंज्या वेतनावर काम करीत होते. कुटुंबातील तरूण व्यक्ती गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.