‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
By राजू इनामदार | Updated: May 10, 2025 17:08 IST2025-05-10T17:07:02+5:302025-05-10T17:08:12+5:30
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत एकतर अजित पवार यांना विचारा किंवा मग सुप्रिया सुळे यांना विचारा

‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
आळंदी(पुणे) : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरत आहे. याविषयीचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘याबाबत एकतर अजित पवार यांना विचारा किंवा मग सुप्रिया सुळे यांना विचारा ! बेगाने शादी मे अब्दुल्ला दीवाना मला का करता?’ असे म्हणत भिरकावून लावला.
संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सवासाठी फडणवीस शनिवारी सकाळी आळंदीत आले होते. त्यावेळी पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, “पाकिस्तान हे आंतकवादी राष्ट्र आहे हे आता जगाला समजले आहे. आतंकवादाचेच समर्थन त्या देशाने नेहमीच केले आहे. मात्र आता भारत थांबणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमची सेना योग्य उत्तर देत आहे. राज्यातही आम्ही शुक्रवारीच बैठक घेतली. त्यामध्ये काय खबरदारी घ्यायची ते सर्वांना सांगितले आहे. जिल्हास्तरावर समन्वय ठेवला जाईल याची काळजी घेतली आहे. आमच्या संतांचे जे काही विचार आहेत ते कालजयी विचार आहेत. कितीही शतके उलटली तरी ते विचार कायम राहणार आहेत. ते समाजात रुजले पाहिजेत. त्यासाठीच मी आलो आहे, मला समाधान मिळाले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू
देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले आहे. त्यामुळे आपला विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणाच्यावेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
इंद्रायणीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल
इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. मध्यंतरीच्या कालखंडात काही अडचणी उद्भवल्या होत्या. मात्र सद्यस्थितीत हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह ३९ गावातील पाणी शुद्ध करून केले जाईल. इंद्रायणीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल.