Aashadhi Wari: रायरेश्वर किल्ल्यावरून रायरेश्वर दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 19:23 IST2023-06-14T19:21:24+5:302023-06-14T19:23:10+5:30
रायरेश्वर येथील मंदिरात विणा पूजन करून या दिंडीला सुरुवात करण्यात आली...

Aashadhi Wari: रायरेश्वर किल्ल्यावरून रायरेश्वर दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
भोर (पुणे) : श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेले ठिकाण रायरेश्वर किल्ला येथून पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान झाले. रायरेश्वर येथील मंदिरात विणा पूजन करून या दिंडीला सुरुवात करण्यात आली आहे.
कै. माजी आमदार संपतराव जेधे यांनी सुरू केलेल्या रायरेश्वर पायी दिंडी सोहळ्याला ४५ वर्षे पूर्ण होत असून, हिरडस मावळ, आंबवडे खोरे या भागातील व भोर तालुक्यातील वारकरी दरवर्षी पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करतात. आंबवडे येथे मुक्काम करून वारीचे भोरकडे प्रस्तान झाले आहे. आज वारी भोर येथील वनवासी कल्याण आश्रमात मुक्कामी असून, उद्या सकाळी येथून पंढरपूरकडे प्रस्तान होणार आहे. भोरमधून वारकरी मोठ्या प्रमाणात वारीत सहभागी झाले.
वारीत हभप नामदेव महाराज किंद्रे, बाळासाहेब सोनवणे, रामदास जेधे, प्रदीप शिनगारे, रामदास जेधे, नितीन जेधे, विजय धुमाळ, हभप बापू कंक, प्रवीण शिदे यांच्यासह असंख्य वारकरी सहभागी झाले. दरम्यान, राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरूपाताई थोपटे यांनी पायी वारी दिंडीचे आंबवडे येथे स्वागत करून आंबवडे ते नाटंबीपर्यंत पाच किलोमीटर दिंडीसोबत चालत प्रवास केला. यावेळी गीतांजली आंबवले, सुभाष कोंढाळकर, राजेंद्र शेटे, राजेंद्र खोपडे व वारकरी उपस्थित होते.