बारामती : शहरातील कसबा येथील चिमुरडीचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. शीतल अर्जुन बामणे (वय ६, रा. जामदार रोड, कसबा, बारामती) असे या चिमुरडीचे नाव आहे. बामणे कुटुंबीयांचे जामदार रोडलगत पत्र्याचे घर आहे. याच घरात हे कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी (दि. १२) पहाटे चार वाजता शीतलने तिच्या वडिलांना झोपेतून उठविले. या वेळी तिने घरात मोठा साप निघाल्याचे सांगितले. तिचे वडील अर्जुन यांनी घरात पाहणी केली. त्यानंतर घरात मण्यार जातीचा विषारी साप फिरत होता. अंधार असल्याने त्यांनी या सापाला मारून फेकून दिले. मात्र शीतलला यापूर्वीच सर्पदंश झाला होता. ते कोणाच्याही लक्षात आले नाही. काही वेळाने शीतलने ‘कानाला ऊस कापला आहे,’ अशी वडिलांकडे तक्रार केली. त्यानंतर अर्जुन यांनी तिच्या कानातून चिकट स्राव येत असल्याचे पाहिले. याच वेळी तिला सर्पदंश झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पत्नीसह शीतलला घेऊन त्यांनी तातडीने सिल्वर ज्युबिली रुग्णालय गाठले. मात्र, या ठिकाणी एका महिलेच्या प्रसूतीसाठी डॉक्टर व्यस्त होते, त्यामुळे अर्जुन यांनी एका खासगी रुग्णालयात शीतलला नेले. या ठिकाणी पुन्हा लहान मुलांच्या श्रीपाल हॉस्पिटलमध्ये तिला पाठविण्यात आले. डॉ. मुथा यांनी तातडीने तिला दाखल करून उपचार सुरू केले. मात्र या दरम्यान तिची प्रकृती गंभीर झाली. सकाळी ११ वाजता तिचे हृदयही बंद पडले. डॉक्टरांनी तिला वाचविण्याचे प्रयत्न केले मात्र, तिची प्रकृती गंभीर झाली. मंगळवारी (दि. १३) पहाटे चार वाजता तिचा मृत्यू झाला. सर्पज्ञान नसल्याने पालकांना लक्षात आले नाही. शीतलवर आलेली वेळ इतरांवर येऊ नये. आजही सापांविषयी अज्ञान आहे. हे अज्ञान दूर करणे गरजेचे आहे, अन्यथा किती ‘शीतल’चा बळी केवळ अज्ञानामुळे जाईल, याची कल्पना आपण करू शकणार नाही, असे सर्पमित्र कांबळे, अर्जुन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सर्पदंश झाल्याने चिमुरडीचा मृत्यू
By admin | Updated: May 25, 2014 05:06 IST