फेक नरेटिव्हमुळे भाजपचे २०२४ लोकसभा निवडणुकीत प्रचंड नुकसान; कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे - रवींद्र चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 09:34 IST2026-04-08T09:33:29+5:302026-04-08T09:34:32+5:30
वाऱ्यासारखा हा फेक नरेटिव्ह पसरला. त्यामुळे, डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यकर्त्यांनी आता सक्रियपणे कार्यरत व सतर्क राहावे

फेक नरेटिव्हमुळे भाजपचे २०२४ लोकसभा निवडणुकीत प्रचंड नुकसान; कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे - रवींद्र चव्हाण
पुणे : फेक नरेटिव्हमुळे भाजपचे सन २०२४ लोकसभा निवडणुकीत प्रचंड नुकसान झाले. वाऱ्यासारखा हा फेक नरेटिव्ह पसरला. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये, याकरिता डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यकर्त्यांनी आता सक्रियपणे कार्यरत व सतर्क राहावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
भाजपच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित सक्रिय कार्यकर्ता संमेलनात चव्हाण बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, राज्य सरचिटणीस राजेश पांडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका सभागृहनेते गणेश बीडकर आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, राज्यात पक्षाचे आज दीड कोटी सदस्य आणि अडीच लाख सक्रिय सदस्य कार्यरत आहेत. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढील वर्षभराचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक लाख सहा हजार बूथमध्ये ५१ टक्के संघटन वाढवणे आपले लक्ष्य आहे. भाजपचा कार्यकर्ता सक्रिय असणे गरजेचे आहे. देशात आणि राज्यात विविध निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. लोकप्रतिनिधी यांनी देखील समाजात वावरत असताना सामान्य लोकांसाठी काय करू शकतो याचा विचार करावा. पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यक्रम माध्यमातून पक्षाची विचारधारा अधिक प्रमाणात रुजत असते, त्यामुळे त्याला कार्यकर्त्यांनी प्राधान्य द्यावे.
पुणे शहराची देशात एक वेगळी ओळख असून, ती पुढे प्रभावीपणे नेणे आपले काम आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कोणत्या दिशेने भविष्यकाळात वाटचाल करणार हे सांगण्याचे काम माझे आहे. भाजप पक्षाचा कार्यकर्ता शिस्तप्रिय असावा तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे असू नये. पक्षाची स्थापना आणि मूळ गाभा व विचारधारा यांच्याशी कार्यकर्ता समर्पित असावा. राष्ट्रीय विचारधारा ही आपली मूळ विचारधारा आहे, असेही चव्हाण म्हणाले.