भाजपाने जुने दिवस विसरू नयेत; युतीसाठी पुण्यात हिंदू संघटनांची आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 14:44 IST2019-11-20T14:38:39+5:302019-11-20T14:44:19+5:30
हिंदू महासभा, श्री शिव प्रतिष्ठान, पतित पावन संघटना, हिंदू एकता आंदोलन या आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी एकत्र आले होते.

भाजपाने जुने दिवस विसरू नयेत; युतीसाठी पुण्यात हिंदू संघटनांची आघाडी
पुणे : सरकार फक्त हिंदू विचार, हिंदू हिताचे व्हावे, त्यासाठी भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवे. भाजपने जुने दिवस विसरू नयेत, असा इशारा देतानाच, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह सरकार स्थापन केल्यास त्यांनी गंभीर परिणाम भोगायला तयार व्हावे, असा इशारा पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांनी दिला. समाजकार्य करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना राजकीय भूमिका स्पष्ट करत रस्त्यावर उतरतील, अशी परखड भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.
हिंदू महासभा, श्री शिव प्रतिष्ठान, पतित पावन संघटना, हिंदू एकता आंदोलन या आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी एकत्र आले होते. या पत्रकार परिषदेला मिलिंद एकबोटे, समीर कुळकर्णी, सुनील घनवट, श्याम महाराज राठोड, अनिल पवार उपस्थित होते.
यावेळी एकबोटे म्हणाले की, 'सरकार वारीला संरक्षण देऊ शकत नाही याचे प्रत्यंतर आले आहे. हा देश चैतन्यशील राहिला पाहिजे, ही जबाबदारी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांवर आहे. पण ही जबाबदारी विसरुन इथले राजकारणी मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेत, यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. भाजप-शिवसेनेला जनादेश असतानासुद्धा सरकार स्थापन होत नाहीये.
समीर कुलकर्णी म्हणाले की, मतदारांना कोणत्याही राजकीय पक्षाने गृहीत धरू नये. अन्यथा जनता त्यांचे उत्तर मतदानातून देईल. यापुढे या दोन्ही पक्षांचा एकही आमदार निवडून येणार नाही यासाठी सर्व संघटना मिळून प्रचार करतील. आघाडीबरोबर सरकार स्थापन करून शिवसेना धोक्याच्या घंटेला आमंत्रण देत आहे. आम्ही वैचारिक विरोधासाठी सरसावू.
यावेळी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- महाराष्ट्रात नवे जेएनयु होऊ नये आणि येथील विद्यार्थी लाल माकडांच्या नादी लागू नये.
- महाआघाडी हे संकट आहे. हा आमचा विश्वासघात आहे.
- लोकांच्या भावनांशी खेळत आहे.
- ही महाशिवआघाडी होऊ देणार नाही. ती महाधूर्तआघाडी आहे.