आदित्य ठाकरेंचा एक फोन खणाणला आणि बारामतीतल्या बिहारी कामगारांना जेवणाचा घास मिळाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 18:09 IST2020-04-10T17:57:00+5:302020-04-10T18:09:29+5:30

कुटुंबियांची माणुसकीची तळमळ झाली अधोरेखित

Bihari workers from Baramati got lunch after Aditya Thackeray's one phone call | आदित्य ठाकरेंचा एक फोन खणाणला आणि बारामतीतल्या बिहारी कामगारांना जेवणाचा घास मिळाला..

आदित्य ठाकरेंचा एक फोन खणाणला आणि बारामतीतल्या बिहारी कामगारांना जेवणाचा घास मिळाला..

ठळक मुद्देबारामती एमआयडीसीत अडकले २० कामगार कामगारांचा शोध घेवुन त्यांना एका महिन्याचे जेवणाचे सर्व साहित्य

- प्रशांत ननवरे-
बारामती : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आलेल्या बारामती एमआयडीसीत काम करणाऱ्या बिहारी कामगारांनी थेट बिहारच्या नेत्यांना संपर्क साधला. त्यानंतर बिहारी नेत्यांनी हा विषय शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितला. ठाकरे यांनी त्याची दखल घेत बारामतीच्या शिवसैनिकांना बिहारींना मदत करण्याबाबत सूचना दिल्या.शिवसैनिकांनी तात्काळ धाव देत बिहारी कामगारांना मदतीचा हात दिला आहे.त्यामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. त्याला एमआयडीसी देखील अपवाद नाही.मात्र, एमआयडीसीत काम करणारे परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमध्ये चांगलेच फसले आहेत. शिवसेना नेत्यांची,शिवसेना कार्यकर्त्यांच्या कार्यतत्परतेमुळे परप्रांतीय कामगारांना आधार मिळाला आहे.
शिवसेना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र काळे यांनी हा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बिहारचे काही कामगार बारामतीमधील कंपनीत काम करीत आहेत.परंतु, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे त्यांना काम बंद करून घरातच थांबावे लागले, त्यामुळे ते खूप अडचणीत होते.कामगारांची लॉकडाऊनमुळे उपासमार होत होती. पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी हा विषय गांभीर्याने घेत बारामतीचे अ‍ॅड. राजेंद्र काळे यांना मोबाईलवर संपर्क साधत संबंधितांना मदतीच्या सुचना दिल्या, ताबडतोब परप्रांतीय कामगारांना भेटण्यासाठी सांगितले. काळे यांच्यासह बारामतीच्या शिवसैनिकांनी तत्काळ त्या कामगारांचा शोध घेतला.त्या कामगारांची व्यथा जाणुन घेत  त्यांना धीर दिला ,त्याची विचारपूस केली. तसेच त्यांना येणा अडचणी सोडविल्या. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.त्यानंतर कामगारांची गैरसोय दूर केल्याची माहिती बिहारमधील नेते कुणाल सिकंद यांना फोन करुन दिली. सिकंद यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत आभार व्यक्त केले. या घटनेमुळे ठाकरे कुटंबीय यांची लोकांसाठी असलेली तळमळ पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
———————————————
बारामती एमआयडीसीत २० कामगार अडकले आहेत.त्यांना लॉकडाऊनमुळे घरातुन बाहेर पडता येत नव्हते.त्यांच्याकडे स्वयंपाकाची साधने नव्हती. त्यांच्या मदतीसाठी आदित्य ठाकरेंनी मला संपर्क साधत मदतीच्या सूचना दिल्या.त्याप्रमाणे चौधरीवस्ती येथे त्या कामगारांचा शोध घेवुन त्यांना एका महिन्याचे जेवणाचे सर्व साहित्य देण्यात आले आहे.वैद्यकीय अडचणी आहेत का,याची माहिती घेवुन सोशलडीस्टन्स पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अ‍ॅड.राजेंद्र काळे, शिवसेना, जिल्हाध्यक्ष. 
———————————————————

Web Title: Bihari workers from Baramati got lunch after Aditya Thackeray's one phone call