ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा अन् उद्धव यांना भेटण्याची भाषा..! मंत्री शिरसाठ नेमकं काय म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:22 IST2025-06-13T14:21:41+5:302025-06-13T14:22:12+5:30
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले,आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! पोरांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, लवकर लग्न करावं. वडिलांना त्रास होता कामा नये, याचीही काळजी घ्यावी.

ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा अन् उद्धव यांना भेटण्याची भाषा..! मंत्री शिरसाठ नेमकं काय म्हणाले..
पुणे - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युती होणार असल्याच्या चर्चांवर आज सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे कुटुंब एकत्र यावं, यावर आमच्या शुभेच्छा आहेत. भेट झाली, यात काही राजकीय चर्चा झाल्या असतील. शरद पवार आणि अजित पवार एकमेकांना भेटत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मला बोलावलं तर मी नक्कीच भेटायला जाईन. पण त्यानंतर पुन्हा राजकीय चर्चा करू नका,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आज पुण्यातील बालगंधर्व येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले,आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! पोरांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, लवकर लग्न करावं. वडिलांना त्रास होता कामा नये, याचीही काळजी घ्यावी. भविष्यात ते चांगले, मोठे नेते व्हावेत, ही मनापासून शुभेच्छा.”
दरम्यान, गुजरातहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान काल अहमदाबादमधील मेघाणी नगर परिसरात कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत त्यांनी दुःख व्यक्त केलं. ही विमान दुर्घटना संपूर्ण देशाला जागं करणारी होती. मन हेलावणारी घटना आहे. अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडले. चूक कशी झाली, कोणामुळे झाली, याची चौकशी होईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत असं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, एअर इंडियाचा अपघात झाल्यानंतर मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. त्या परिसराचा पुनर्विकास व्हायचा होता, पण तो अद्याप झाला नाही. भविष्यात अशाच घटना पुणे आणि मुंबईतही घडू शकतात. त्यामुळे येत्या काळात योग्य उपाययोजना करायला हव्यात.