काळजी घ्या! कात्रज, कोंढवा आंबेगावात फूड पॉयझनिंगचे रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 11:35 IST2023-09-01T11:34:51+5:302023-09-01T11:35:01+5:30

उघड्यावरील अन्नातून होणारी विषबाधा (फूड पॉयझनिंग) आणि दूषित पाणी यामुळेच ही साथ सुरू झाल्याचे खासगी डॉक्टर सांगतात मात्र महापालिकेकडून अद्याप यावर खुलासा आलेला नाही....

Be careful! Food poisoning patients increased in Katraj, Kondhwa Ambegaon | काळजी घ्या! कात्रज, कोंढवा आंबेगावात फूड पॉयझनिंगचे रुग्ण वाढले

काळजी घ्या! कात्रज, कोंढवा आंबेगावात फूड पॉयझनिंगचे रुग्ण वाढले

कात्रज : गेल्या काही दिवसांपासून कात्रज, कोंढवा, आंबेगाव परिसरात उलट्या-जुलाबाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. एकीकडे डोळ्यांची साथ आटोक्यात आली नसताना आता उलट्या-जुलाबांची साथ सुरू झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उघड्यावरील अन्नातून होणारी विषबाधा (फूड पॉयझनिंग) आणि दूषित पाणी यामुळेच ही साथ सुरू झाल्याचे खासगी डॉक्टर सांगतात मात्र महापालिकेकडून अद्याप यावर खुलासा आलेला नाही.

कात्रज चौक, कोंढवा रोड, दत्तनगर चौक, जांभूळवाडी रोड यावर अनेक ज्युस सेंटर, चहा, वडापाव बनवणाऱ्या टपऱ्या, हॉटेल आहेत यांच्याकडे फूड लायसन्स आहे का? नसेल तर आरोग्य विभाग काय कारवाई करतो, असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरात अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या व टपऱ्यांमुळे रोगराई पसरत आहे. अस्वच्छता, घाण पाणी आणि कोणतेही फूड लायसन, शाॅप ॲक्ट लायसन नाही त्या साऱ्या गोष्टी प्रशासनाला माहीत असतानादेखील प्रशासनाकडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले जाते.

दररोज आपण घरातून बाहेर पडल्यानंतर हॉटेल असेल किंवा हातगाडे असतील अशा अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ खात असतो. त्याचबरोबर पाणीदेखील पीत असतो. परंतु आपण खात असलेले अन्नपदार्थ कितपत खाण्या योग्य आहे याची बरेचजण काळजी घेताना दिसून येत नाही. बऱ्याच ठिकाणी अन्नपदार्थ बनवताना योग्य ती काळजी घेतली जात नाही, असे निदर्शनास दिसून येत आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून घरातील सदस्यांना पोटाचे विकार जाणवू लागले आहेत. यामुळे उलटी जुलाब होत आहेत. दूषित पाण्यामुळे की बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्याने हे समजून येत नाही.

दुर्गा कोरे, नागरिक

उच्च आर्द्रता आणि तापमानातील चढउतारांमुळे पावसाळा हा ऋतू जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य आहे, परिणामी अन्नातून विषबाधाच्या घटनांमध्ये वाढ होते. बॅक्टेरिया, विषाणू आणि पॅरासाइटनी दूषित अन्न किंवा पाण्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. अतिसार, वेदनादायक पेटके, मळमळ आणि उलट्या ही अन्न विषबाधाची लक्षणे आहेत.

- डॉ. नीलेश गुजर, बालरोगतज्ज्ञ

मागील वीकेंडला लागून सुट्ट्या आल्यामुळे लोक मोठ्या संख्येने पिकनिकसाठी बाहेर पडले होते. बाहेरचे खाण्यात आल्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका वाढला आणि फूड पॉयझनिंगसदृश रुग्णांची संख्या वाढली. या आजाराची तीव्रता प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते.

- डॉ. प्रदीप खाबिया

Web Title: Be careful! Food poisoning patients increased in Katraj, Kondhwa Ambegaon