Baba Adhav Passes Away : सामाजिक शोषणाचे मूळ शाेधून दुखणे बरे करणारे खरे डाॅक्टर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:11 IST2025-12-09T13:09:41+5:302025-12-09T13:11:09+5:30

आयुर्वेदाचा डॉक्टर म्हटलं की दुखणं मुळापासून बरं करतो ही ख्याती असते. डॉक्टर बाबा आढाव हे देखील आयुर्वेदाचे डॉक्टर होते. ते पुणे शहराची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नाना पेठ मध्ये प्रॅक्टिस करत होते. यामुळे इथे येणाऱ्या व्यावसायिक कामगारांशी तसेच हमालांशी त्यांचा जवळून संबंध आला.

Baba Adhav Passes Away a true doctor who heals the pain by finding the root of social exploitation..! | Baba Adhav Passes Away : सामाजिक शोषणाचे मूळ शाेधून दुखणे बरे करणारे खरे डाॅक्टर..!

Baba Adhav Passes Away : सामाजिक शोषणाचे मूळ शाेधून दुखणे बरे करणारे खरे डाॅक्टर..!

- डॉ. निरज जाधव

आयुर्वेदाचा डॉक्टर म्हटलं की दुखणं मुळापासून बरं करतो ही ख्याती असते. डॉक्टर बाबा आढाव हे देखील आयुर्वेदाचे डॉक्टर होते. ते पुणे शहराची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नाना पेठ मध्ये प्रॅक्टिस करत होते. यामुळे इथे येणाऱ्या व्यावसायिक कामगारांशी तसेच हमालांशी त्यांचा जवळून संबंध आला. यातूनच त्यांना हमालांचे होणारे शोषण लक्षात आले. हमालांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही याची मोठी खंत बाबांना वाटली.डॉक्टर बाबा आढाव यांना या हमालांचे केवळ शारीरिक दुखणे बरे करणे पुरेसे वाटले नाही. त्यांच्या या अवस्थेला जबाबदार असणारे मूळ सामाजिक शोषणाचे दुखणे बरे करणे बाबांनी अधिक महत्त्वाचे समजले.

यातूनच त्यांनी १९६६ मध्ये आपला चांगला चाललेला डॉक्टरकीचा व्यवसाय सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले. दीर्घकालीन आजाराची चिकित्सा करायची तर केवळ लक्षणांवर उपचार करून चालणार नाही त्यासाठी आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन त्यावर सातत्यपूर्ण उपचार करणे गरजेचे आहे. हे वैद्यकीय तत्व बाबांनी सामाजिक प्रश्नांना लागू केले आणि त्यासाठी संघटित आंदोलने उभारली.त्यांनी फेरीवाले, कचरावेचक आणि हमाल या असंघटित कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी हमाल पंचायतची स्थापन केली. हमालांच्या प्रश्नावरती बाबांनी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे १९६९ ला राज्यात महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा हा असंघटित कामगारांच्या कल्याण आणि सुरक्षेसाठी भारतातील पहिला कायदा मंजूर झाला. हमालांचे शोषण करणारा आजार केवळ बरा करून बाबा थांबले नाही तर आजाराला प्रतिबंध करणारी लसही बाबांनी शोधून काढली.

डॉ. आढाव हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जातीविरोधी मतांचे अनुयायी होते. त्यातूनच त्यांनीही वर्ग, जाती आणि स्त्री-पुरुष विषमतेविरोधात अनेक आंदोलने केली. १९५२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या वेळी महागाई आणि अन्नधान्याच्या साठेबाजीविरोधात त्यांनी सत्याग्रह केला. १९६२ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या पुनर्वसन धोरणाविरोधात आंदोलन केले. १९७२ मध्ये दलितांना सर्व ठिकाणी पाणी मिळावे, यासाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ नावाने राज्यभर मोर्चे काढले. पुण्यातील कामगारांना स्वस्त, पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणारी ‘कष्टाची भाकरी योजना’ ही देखील आढाव यांचीच कल्पना होती.
 

इतकेच काय बाबांच्या ९६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा मी डॉक्टर आहे आणि सामाजिक जीवनात सक्रिय आहे हे लक्षात आल्यावर बाबांनी मला प्रश्न केला की परदेशातून जीवनसत्त्वांच्या गोळ्या आपण मागवत आहोत परंतु इथे मिळणारा आहारच आता उत्तम दर्जाचा मिळत नाही.धान्ये कडधान्य ही सुद्धा उत्तम प्रतिची मिळत नाही याच्याबद्दल तुमचे मत काय आहे. समोरच्याला सामाजिक प्रश्नांबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारे बाबा हे परिवर्तनासाठीची अखंड प्रेरणा होते.

केवळ निवडणुका होणे लोकप्रतिनिधी निवडून येणे म्हणजे लोकशाही नव्हे. लोकांच्या सक्रिय सहभागातून जी निर्माण होते ती लोकशाही या आपल्या जाणीवेशी प्रामाणिक राहात वयाच्या 95 व्या वर्षी निवडणुकांमध्ये झालेल्या गैरकारभाराविरुद्ध बाबा उपोषणाला बसले.अलीकडेच आलेल्या जीवघेण्या पूर परिस्थितीमध्ये सरकार पूर परिस्थितीचा आढावा घेण्यामध्ये दंग होते. बाबा मात्र तत्परतेने गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलनाला बसले आणि शक्य तितकी मदत गोळा करून ती पूरग्रस्तांसाठी पाठविली. तातडीच्या वेळेला विचार नाही तर उपचार करायचे असतात ही जाणीव डॉ. बाबा आढाव यांनाच असू शकते.

आजाराने शरीर ग्रासले असले तरी चिकित्सा ही मनापासून सुरू करायची याची पक्की जाणीव बाबांना होती.यामुळेच लोकांच्या मनाचा ठाव घेत माणसांची बांधणी करणं बाबांना शक्य झालं. भेटतील तेव्हा केवड्याचा सुगंध सर्वांना सढळं हस्ताने वाटणारे बाबा. लहान मूल समोर येतात खिशातून चॉकलेट काढून देणारे बाबा. माणूस जवळ येताच मायेने पाठीवर हात फिरवणारे बाबा हे खऱ्या अर्थाने युगपुरुष होते. लढवय्ये होते. फक्त राज्यकर्त्यांनाच नव्हे तर मृत्यूला देखील चकवा देऊन सत्य सर्वांचे आदीघर सर्व धर्मांचे माहेर हे अखंड पुनरुचार करते झाले.

हरपलेली शांतता वाढलेली विषमता संपलेला सामाजिक सलोखा यामुळे अस्वस्थ असणारे भवताल पाहून स्वतः अस्वस्थ होणारा आणि या परिस्थितीवर मात करता येईल यासाठी प्रामाणिकपणे झटणारा एक सिद्ध हस्त चिकित्सक डॉक्टर आपण गमावला आहे ही सामाजिक आरोग्याची कधीही भरून काढता येणार नाही अशी झालेली हानी आहे.

Web Title : बाबा आढाव का निधन: सामाजिक शोषण का इलाज करने वाले डॉक्टर!

Web Summary : डॉ. बाबा आढाव, एक सच्चे सामाजिक चिकित्सक, ने अपना जीवन हमाल और कचरा बीनने वालों जैसे असंगठित मजदूरों के अधिकारों के लिए लड़ने में समर्पित कर दिया। उन्होंने हमाल पंचायत की स्थापना की, उनके कल्याण की वकालत की और श्रम कानूनों का बीड़ा उठाया। उनके काम ने समानता और सामाजिक न्याय का समर्थन किया, एक स्थायी प्रभाव छोड़ा।

Web Title : Baba Adhav Passes: A Doctor Who Cured Social Exploitation!

Web Summary : Dr. Baba Adhav, a true social doctor, dedicated his life to fighting for the rights of unorganized laborers like headloaders and waste pickers. He established the Hamal Panchayat, advocating for their welfare and pioneering labor laws. His work championed equality and social justice, leaving a lasting impact.