कारवाईचा बडगा उगारताच पीएमपीच्या रद्द फेऱ्यांत घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:04 IST2025-06-28T16:02:04+5:302025-06-28T16:04:53+5:30
-वरिष्ठ अधिकारी मार्गावर उरल्याने चालक, वाहक धास्तावले

कारवाईचा बडगा उगारताच पीएमपीच्या रद्द फेऱ्यांत घट
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील बस फेऱ्या अनेक वेळा बिघाड झाल्याचे कारण सांगून अचानक रद्द केेल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास बसची वाट पाहत थांबावे लागत होते. परंतु गेल्या एक महिन्यापासून वरिष्ठ अधिकारी आठवड्यातून दोन दिवस पीएमपीमधून प्रवास करत आहेत. त्यामुळे अचानक रद्द होणाऱ्या बस फेऱ्यांचे प्रमाण कमी झाले असून, फेऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पीएमपी प्रवाशांना दिलासा मिळत आहे.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. त्यातून दैनंदिन दहा लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात. प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या कमी पीएमपी बसला प्रचंड गर्दी असते. असे असताना इंजीनमध्ये बिघाड झाला आहे. चार्जिंग संपला आहे, ब्रेक फेल झाला आहे, अशा विविध कारणे सांगून नियोजित बसफेऱ्या अचानक रद्द करत होते. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीचे प्रमाण वाढले होते. पीएमपी अध्यक्षांनी आगार व्यवस्थापकांपासून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बस संचलन सुरळीत व्हावी, प्रवाशांची संख्या वाढवावी, यासाठी दर बुधवार आणि गुरुवारी बसमधून करण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे सर्व अधिकारी कधीही मार्गावर फिरत आहेत. त्यामुळे पीएमपी बस फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
खासगी बसचे प्रमाण जास्त
पीएमपीच्या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये तांत्रिक कारण सांगून बस फेऱ्या रद्द करण्याचे प्रमाण खासगी ठेकेदारांच्या बसचे जास्त होते. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना भेडसावत होते. परंतु वरिष्ठ अधिकारी स्वत: मार्गावर फिरत असल्याने संचलनातील बस देखभाल दुरुस्ती करून सोडण्यात येत आहे. शिवाय बस थांब्यावर न थांबता बस दामटणाऱ्या चालक धसका घेतल्याने बस मार्गावर सुरळीत धावत आहेत.
ब्रेक डाउनचे प्रमाण घटले
मार्गावर सोडण्यात येणाऱ्या बस या फिटनेसविना सोडण्यात येत होते. त्यामुळे रस्त्यामध्ये दररोज ५० पेक्षा जास्त बस बंद पडत होते. आता मार्गावर बस सोडताना तांत्रिक तपासणी करून सोडण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर बस बंद पडण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे.
प्रवाशांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, बस संचलन सुरळीत व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांना मार्गावर फिरणे सक्तीचे केले आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे. शिवाय फेऱ्या रद्द होणे, ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी होत आहे. भविष्यात आणखी सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. - दीपा मुधाेळ - मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी