स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
By राजू हिंगे | Updated: June 10, 2025 19:54 IST2025-06-10T19:52:22+5:302025-06-10T19:54:48+5:30
निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे, पक्षात चुकीचे वागणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, पक्षात गटातटाला थारा नाही

स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
पुणे : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत विशेषतः महापालिका निवडणुकीत मुंबईत एक सदस्यीय वॉर्ड, तर अन्य ठिकाणी चार सदस्यीय प्रभाग रचना असु शकते. ही प्रभाग रचना स्वीकारण्याची मानसिकता आपण ठेवली पाहिजे. स्थानिक नेतृत्व व कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल, अन्यथा त्यांच्या मतानुसार निवडणुकीला सामोरे जावू असे सांगतानाच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे. पक्षात चुकीचे वागणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. पक्षात गटातटाला थारा नाही. पक्ष एक परिवार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट २६ वा वर्धापन दिन सोहळाचा कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुण तरुणींना, महिलांना अधिकाधिक संधी दिली जाणार आहे. मुबंई महापालिकेत मध्ये एकचा तर अन्य पालिकेत चारचा असणार आहे. आता काहींचे मतप्रवाह वेगळे असतील.जसे प्रभाग ठरतील, तशी मानसिक तयारी ठेवा. सर्व समाजघटकांच्या लोकांना सभासद नोंदणीत सहभागी करून घ्या.मोठ्या जिल्ह्यांनी ५ लाखांपेक्षा जास्त सभासद नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करावे. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा आणि सुसंस्कृत राजकारणाची जडणघडण केली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्याला अधिक जोमाने करायचं आहे. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा सर्व क्षेत्रांत महाराष्ट्राने पहिल्या क्रमांकावर असावं, हा आपला प्रयत्न आहे.अनेक कार्यकर्ते, सहकारी आहेत शेवटी आपल्याला काम करायचं आहे. जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून दिलेलं आहे. आता जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जावू द्यायचा नाही. तशा पद्धतीने आपल्या सगळ्याचं काम सुरू झालेलं आहे,असे अजित पवार यांनी सांगितले.
अरे पैसे सोडत नाही.. काय माझ्या खिशात पैसे घेवून बसलोय?
कधीकधी काही काहीजण अशा बातम्या सोडतात, की अजित पवार पैसे सोडत नाहीत. अरे पैसे सोडत नाही.. काय माझ्या खिशात पैसे घेवून बसलोय? शेवटी राज्य सरकराने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही २० ट्कके सोडतो, दुसऱ्या तिमाहीत ४० ट्कके सोडतो, तिसऱ्या तिमाहीत ६० टक्के सोडतो. नंतर ८० टक्के आणि शेवटच्या महिन्यात १०० टक्के. या पद्धीतचे ते नियोजन केलेल असते.