Video : अंतिम अहवाल येऊ द्या, मगच ...; रोहित पवारांच्या संशयावर मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:47 IST2026-03-06T14:44:14+5:302026-03-06T14:47:18+5:30
अंतिम अहवाल आल्यानंतरच त्यावर बोलणे योग्य ठरेल असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

Video : अंतिम अहवाल येऊ द्या, मगच ...; रोहित पवारांच्या संशयावर मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रत्युत्तर
पुणे - पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विमान अपघात, चौकशी प्रक्रिया तसेच परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमात बोलताना मोहोळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा वर्धापन दिन आणि शिवजयंती एकत्र साजरी करण्यात आली. या स्मारकामुळे शिवचरित्राचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विमान अपघाताबाबत चौकशी सुरू
अजित पवार यांच्या अपघाताबाबत विचारलेल्या प्रश्नावर आणि रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयावर प्रतिक्रिया देताना मोहोळ यांनी सांगितले की तपास यंत्रणा आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांनी सांगितले की, DGCA आणि AAIB या दोन्ही संस्था नियमानुसार चौकशी करत आहेत. विमान अपघातानंतर एका महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल देणे बंधनकारक असते आणि तो अहवाल आधीच सादर झाला आहे. प्राथमिक अहवालानंतर सखोल चौकशी सुरू आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच त्यावर बोलणे योग्य ठरेल असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
आखाती देशांतील परिस्थितीवर सरकारची नजर
आखाती देशांमधील युद्धस्थितीबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने थेट विमानसेवा उपलब्ध करून अनेक नागरिकांना परत आणले. काही विमानतळ बंद असल्याने परिस्थिती वेगळी होती; मात्र विविध देशांतील भारतीय दूतावासांशी समन्वय साधून प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या मते, काही दिवसांपूर्वी सुमारे ५० हजार भारतीय अडचणीत होते, त्यापैकी अनेकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे. या युद्धाचा महागाईवर परिणाम होऊ शकतो, परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आसाम विमान अपघातावरही चौकशी
आसाममध्ये घडलेल्या विमान अपघातावर बोलताना मोहोळ म्हणाले की, अशा प्रत्येक घटनेनंतर ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार तपास केला जातो. संबंधित घटनेचाही सविस्तर अहवाल सादर केला जाईल.