अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही; भाऊ श्रीनिवास पवार यांची माहिती, कारण सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:57 IST2026-02-03T13:42:22+5:302026-02-03T13:57:14+5:30
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. दरम्यान, आता अजित पवार यांच्या दशक्रिया विधीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही; भाऊ श्रीनिवास पवार यांची माहिती, कारण सांगितलं
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यांचे निधन होऊन पाच दिवस उलटले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतरच्या धार्मिक विधींबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांचा 'दशक्रिया विधी' होणार नाही, अशी माहिती अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी दिली. अस्थि विसर्जना दिवशीच सर्व धार्मिक विधी पार पाडले असल्यामुळे आता कोणताही विधी केला जाणार नसल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य शोकसागरात बुडाले होते. दरम्यान, तिसऱ्या दिवशीच सर्व धार्मिक विधी केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता दहावे आणि तेरावे होणार नाही. याबाबत आता अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपाकडून महापौर निवडीनंतर फटाके न फोडण्याच्या सूचना
दरम्यान, राज्यभरात आता महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला फक्त पाच दिवस उलटले आहे. राज्य अजूनही शोकसागरात आहे. यामुळे आता भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांना महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर फटाके न फोडण्याचे आणि गुलाल न उधळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“विमान अपघातावर संशय येणं साहजिक- चंद्रकातदादा पाटील
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. या अपघात प्रकरणी उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. अनेकांनी या अपघातावर संशय व्यक्त केला असून चौकशी करण्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान, आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मोठ्या राजकीय व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संशय व्यक्त होणं हे साहजिक असल्याचं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. ते सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “जेव्हा जेव्हा एखाद्या राजकीय व्यक्तीचा अपघात होतो आणि त्यामध्ये मोठी राजकीय व्यक्ती दगावतो, तेव्हा नातेवाईकांमध्ये आणि विरोधकांमध्ये संशय निर्माण होतो. त्या संदर्भातील चर्चा होणं चुकीचं नाही.” या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली असून, या प्रकरणाचा अहवाल लवकरच समोर येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.